रानभाज्यांना उठाव नाही,
पालीत आदिवासी भाजीविक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत
पाली/बेणसे | वार्ताहर |
कोरोना महामारीने मोठे संकट उभे केले. रोजगारावर मोठी कुर्हाड कोसळली. पावसाळ्यात रानावनात उगवणार्या रानभाज्या विकून जिल्ह्यातील असंख्य आदिवासींच्या घरातील चुली पेटतात. मात्र, कोरोनाचे सावट व लोकडाऊन यामुळे या रानभाज्यांना उठावच नाही. त्यामुळे धंदा निम्म्याने कमी झाला आहे, असे पालीत बहुसंख्य आदिवासींनी सांगितले. परिणामी, आदिवासींचा रोजगार हिरावला गेला आहे.
दोन वर्षांपूर्वी रानभाज्या विकून दिवसाला 300 ते 400 रुपये मिळायचे. मात्र, आता जेमतेम 150 ते 200 रुपयांवर समाधान मानावे लागत आहे, असे ताई वाघमारे या महिलेने सांगितले. सलग दुसर्या वर्षी कोरोना आणि लॉकडाऊन असल्याने रानभाज्यांना गिर्हाईक नाही. विशेष म्हणजे, दरदेखील स्थिर असताना रानभाज्या पडून राहात आहेत. पावसात दिवसभर बसूनदेखील विक्री होत नसून, थोडेफार पैसे घेऊन घरी परतावे लागत आहे, असे पार्वती वाघमारे या रानभाजी विक्रेत्या महिलेने सांगितले.
या रानभाज्या प्रामुख्याने आदिवासी महिला बाजारात विकण्यास आणतात. ओल्या काजूगरांचा हंगाम सरल्यावर पावसाळ्यात या रानभाज्या आदिवासींना हक्काचे दोन पैसे मिळवून देतात. जिल्ह्यात या हंगामात शेवळं, टाकळा, कुर्डू, शेंडवळ, अळू, खरसुंडीच्या शेंगा, भारंगी, कर्टुले, फोडशी, काकडं, भोंड्याची भाजी अशा विविध रानभाज्या मिळतात. या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. कारण त्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्व व खनिजद्रव्य असतात. सोबतच पावसाळी मोसमात आपल्या शरीराला आवश्यक औषधी गुणधर्म त्यात सामावलेली असतात.
रानभाज्या विक्रीसाठी जिल्ह्यात स्थानिक पातळीवर हक्काची बाजारपेठ मिळाली पाहिजे. रानभाज्यांचे दर निश्चित करायला हवेत. रानभाजी महोत्सवासारखे उपक्रम राबवून रानभाज्यांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे.
रमेश पवार, कोकण संघटक,
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, शाखा रायगड