पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव; मेहदी-मुश्ताफिजूरने विजयाचा घास पळविला
| ढाका | वृत्तसंस्था |
आधी फलंदाजांनी, त्यानंतर गोलंदाज आणि ढिसाळ क्षेत्ररक्षकांनी बांगलादेशपुढे अक्षरशः लोटांगण घातल्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. 50 षटकात भारताला अवघ्या 187 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशची 9 बाद 136 अशी अवस्था झाली होती. परंतु, मेहदी व मुश्ताफिजूर या अखेरच्या जोडीने निर्णायक खेळी साकारत भारताकडून सामना खेचून आणला.
भारताच्या फलंदजांनी या सामन्यात हाराकिरी पत्करली. रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन अपयशी ठरले. पण यावेळी लोकेश राहुलने 73 धावा करत संघाची लाज राखली. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 186 धावा करता आल्या. भारताच्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने संयतपणे खेळ केला. पण, भारताने सामना आपल्या बाजूने झुकवत बांगलादेशचे 9 विकेट्स मिळवेल होते. पण, अखेरच्या जोडीने भारताला धक्का देत बांगलादेशला विजय मिळवून दिला. बांगलादेशच्या मेहंदी हसने मिराजने यावेळी निर्णायक खेळी साकारली आणि भारताकडून विजय हिसकावून घेतला.
भारताच्या 187 धावाचा पाठलाग करताना बांगलादेशला पहिल्याच चेंडूवर दीपक चहरने धक्का दिला. पण त्यानंतर मात्र नवा कर्णधार लिटॉन दासने भारताच्या गोलंदाजीचा चांगला प्रतिकार केला. दासने यावेळी 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. दासला अर्धशतक झळकावता आले नसले तरी त्याने संघाच्या डावाला चांगला आकार दिला. त्यानंतर भारताच्या मार्गात शकिब अल हसन हा मोठा अडसर होता. पण यावेळी विराट कोहलीने त्याचा भन्नाट झेल पकडला आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. पण त्यानंतर महमदुल्लाह आणि मुशफिकर रहिम ही अनुभवी जोडी मैदानात होती. त्यामुळेच भारताच्या विजयाच्या आशा धुसर दिसत होत्या. पण हे दोघेही सलग चेंडूंवर बाद झाले आणि सामन्यात नवा ट्विस्ट आला. पण अखेरच्या जोडीने यावेळी चचांगली झुंज दिली आणि भारताला पराभूत केले.
भाराताच्या फलंदाजांनी यावेळी बांगलादेशच्या पहिल्याच सामन्यात निराशा केली. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात फॉर्ममध्ये परतणे अपेक्षित होते, तर कोहलीने पहिल्या एकदिवसीय सामन्यातही टी-20 फॉर्म दाखवण्याची अपेक्षा होती. पण ते दोघेही पहिल्या एकदिवसीय सामन्यात अपयशी ठरले. पण राहुलने पहिल्याच सामन्यात एकाकी झुंज देत अर्धशतक झळकावले. त्यामुळेच या सामन्यात भारताला दीडशे धावांची वेस तरी ओलांडता आली. जेव्हा राहुल फलंदाजीला आला तेव्हा भारताची वाईट अवस्था होती. राहुल बॅटिंगला उतरला तेव्हा टीम इंडियाने आपले तीन महत्त्वाचे बॅट्समन गमावले होते. शिखर धवन (7), रोहित शर्मा (27) आणि विराट कोहली (9) धावा करून बाद झाले. संघाची धावसंख्या तीन गडी गमावून 49 धावा होती. येथून राहुलने डाव सांभाळला. श्रेयस अय्यरने त्याला काही काळ साथ दिली आणि संघाची धावसंख्या 92 पर्यंत नेली. अय्यर 24 धावा करून बाद झाला. त्यानंतर सुंदरने राहुलच्या साथीने डाव पुढे नेला. राहुलने सुंदरसोबत अर्धशतकीय भागीदारी केली. सुंदर आणि राहुलने 60 धावांची शानदार भागीदारी करता भारताचा डाव सांभाळला. यानंतर शाकिबने झटपट विकेट्स घेतल्या मात्र राहुल मात्र आपली भूमिका चोख बजावत होता. राहुलने 70 चेंडूत 73 धावा केल्या. आपल्या खेळीत या फलंदाजाने पाच चौकार आणि चार षटकार मारले. राहुल यावेळी शतक झळकावेल, असे वाटत होते. राहुलला यावेळी शतक पूर्ण करण्याची संधीही होती. पण राहुल शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे भारताने या सामन्यात दीडशे धावांची वेस ओलांडली असली तरी त्यांना दोनशे धावा मात्र करता आल्या नाहीत.