। पनवेल । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त 15 ऑगस्ट 2023 पर्यंत आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात हर घर झंडा अर्थात चला फडकवू तिरंगा हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. या निमित्ताने पनवेल तालुक्यातील सर्व घरे, इमारतींवर तिरंगा फडकणार आहे. हर घर झंडा अर्थात चला फडकवू तिरंगा या उपक्रमात आबालवृद्ध सर्व नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडून करण्यात येत आहे.