बेल्जियमकडून 5-2 ने पराभव
| टोक्यो | वृत्तसंस्था |
अपेक्षांचे प्रचंड ओझे असलेल्या भारतीय पुरुष संघाला तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्यात अपयश आलं. विश्वविजेत्या बेल्जियमविरोधात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा 5-2 च्या फरकाने पराभव झाला. यशाची पृनरावृत्ती साद घालत असतानाच पराभवामुळे भारताची ऑलिम्पिकमधील ड्रीम रन संपुष्टात आली.
आठ सुवर्णपदकांसह 11 ऑलिम्पिक पदके खात्यावर असणार्या भारताने एके काळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघाला त्या यशाची पुनरावृत्ती साद घालत असतानाच बेल्जियमकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे सुवर्णपदक पटकावून नवा इतिहास घडविण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
उपांत्य फेरीमध्ये भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्व जगाचं लक्ष लागलं होतं. मात्र पहिल्या हाफमध्ये सामना बरोबरीत राखण्यात यश आल्यानंतर भारतीय संघाला तिसर्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. भारत आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे.
- पराभव, विजय खेळाचा भाग
भारतीय पुरुष हॉकी संघाच्या या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाचं कौतुक करत त्यांचं मनोबल उंचावलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पराभूत होणं किंवा विजय मिळवणं हा खेळाचा भाग आहे. पुढे बोलताना ते हेदेखील म्हणाले की, देशाला सर्व खेळाडूंवर गर्व आहे. आपल्या पुरुष हॉकी संघानं आपली सर्वश्रेष्ठ खेळी केली आणि हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. संघाला पुढचा सामना आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा.