शेकापमुळे खारघर ‘नो लिकर झोन’ – आ. बाळाराम पाटील

| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर ग्रामपंचायतीमध्ये खारघरमध्ये ‘नो लिकर झोन’ हे महत्त्वाचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले. यामुळे खारघर शहर हे सुक्षितांचे शहर म्हणून ओळखले जाते. जोपर्यंत खारघर ग्रामपंचायतीमध्ये शेकापची सत्ता होती, तोपर्यंत कोणताही कर लावला नाही, असे आ. बाळाराम पाटील यांनी सांगितले. ते दि. 5 नोव्हेंबर रोजी खारघरमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले, गेल्या 12 वर्षांत येथील आमदार प्रशांत ठाकूर यांनी जे नुकसान केले, ते भरून काढण्यासाठी आपण आतापासूनच कामाला लागले पाहिजे. यावेळी माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय पाटील, नगरसेवक गोपाळ भगत, शंकर म्हात्रे, गणेश कडू, राम करावकर, अशोक गिरीमकर, अजित अडसुळे आदी मान्यवर उपस्थित होते. या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते नारायण घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले, आता आपल्याला मरगळ झटकून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्यायची आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करू या. गणेश कडू यांनी सांगितले, खारघरचे नंदनवन हे आ. बाळाराम पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना केले आहे. त्यांनी यासाठी 55 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मोरे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात खारघरमधील नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी अजित अडसुळे यांच्या ‘शेकापचा आवाज’ या दिवाळी अंकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Exit mobile version