| माणगाव | वार्ताहर |
शासनाच्या कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2022-23 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहीम प्रत्येक गावामध्ये राबविण्यात येणार आहे. राज्यातील कृषी विभागाचे अधिकारी/कर्मचारी, जिल्हा परिषद कृषी विभाग, विद्यापीठे/कृषी विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ, कृषी मित्र, हे शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दि. 25 जून ते 1 जुलै या कालावधीमध्ये कृषी संजीवनी मोहीम राबविण्यार आहेत. या मोहिमेमध्ये विविध विषयांवर आधारित मार्गदर्शन, पीक प्रात्यक्षिक भेट, चर्चासत्र, परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत. दरम्यान, 25 जून रोजी विविध पिकांची तंत्रज्ञान प्रसार, मुळ्यासाखली बळकटीकरण दिन, 26 जून पौष्टिक तृणधान्य दिवस, 27 जून महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस, 28 जून खत बचत मोहीम, 29 जून प्रगतशील शेतकरी संवाद, 30 जून रोजी शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस, 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करून कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी, शास्त्रज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार असून तालुक्यातील शेतकर्यांनी कृषी विभागाचे विविध योजनांची माहिती व लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी माणगाव आर.डी. पवार यांनी केले आहे.