नेरळ | वार्ताहर |
नेरळ गावातील पूर्व भागातील गंगानगर येथील संरक्षण भिंत महापुरात कोसळली आहे.सदर संरक्षण भिंत तेथे झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे कोसळली असून, तेथे रस्त्याच्या कडेला अनधिकृत बांधकाम करणार्यांवर नेरळ ग्रामपंचायतीने कारवाई करावी, अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे.
स्थानिक आमदारांनी ग्रामपंचायत सदस्यांसह त्या भागाची पाहणी केली होती, मात्र त्यानंतर 15 दिवसांत तेथे गटाराचे काम करून घेण्यात आले नाही किंवा अनधिकृत बांधकाम करणारे यांच्यावर कोणतीही कारवाई नेरळ ग्रामपंचायतीने केली नाही.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील गंगानगर येथे रस्त्याच्या कडेला नेरळ-कळंब रस्त्याला लागून अनधिकृतपणे बांधकाम करून दुकानांचे गाळे बांधले आहेत. त्याचा परिणाम त्या भागातून पावसाचे वाहून जाणारे पाणी हे बांधकामामुळे पुढे जात नव्हते. त्यात जुलै महिन्यात आलेल्या महापुरात गंगानगर भागातील पावसाचे पाणी वाहून जाणारा नाला बंद झाला आणि ते पाणी गंगा नगरमधील चार इमारती आणि काही बैठ्या घरात घुसले होते. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हे नुकसान होत असताना तेथे बांधण्यात आलेली संरक्षण भिंत पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने कोसळली. संरक्षण भिंत कोसळल्यानंतर गंगा नगरमधील महापूराचे घुसलेले पाणी निर्माण नगरी भागात जाण्यास मार्ग मिळाला. त्या अनधिकृत बांधकामाबद्दल गंगानागर भागातील रहिवाशांनी नेरळ ग्रामपंचायतकडे गेली दोन वर्षे गटार बांधकाम करण्यासाठी निवेदने दिली आहेत. मात्र नेरळ ग्रामपंचायतने तेथील मोकळ्या जागेवर गटाराचे बांधकाम न केल्याने तेथे दुकानांचे गाळे बांधून व्यवसाय सुरू झाले आहेत.
महापुरानंतर तेथे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी नेरळ ग्रामपंचायतच्या पदाधिकारी यांनी गंगानागर भागात जाऊन पाहणी केली. त्यावेळी स्थानिक रहिवासी एस.के. माने, नरेश माळी, पी.एम. पवार यांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे संरक्षण भिंत बांधून देण्याची मागणी केली. मात्र आता त्यानंतर 15 दिवसांचा कालावधी लोटला तरी संरक्षण भिंत बांधण्यात आली नाही की गटार पुन्हा बांधण्यात आले नाही किंवा अनधिकृत बांधकाम करणार्यांवर कोणतीही कारवाई नेरळ ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे गंगानागर रहिवासी यांच्या मनात पुन्हा महापूर आल्यास पुराचे पाणी घरात घुसण्याची भीती निर्माण झाली आहे.