बाबासाहेब पुरंदरे नावाच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा आणि आपल्या अमोघ वाणीने त्यांनी उभ्या केलेल्या विशाल कालखंडाचा अस्त ही संपूर्ण समाजाची कधीही भरुन न निघणारी हानी आहेफ, ङ्गत्यांच्या जाण्यानं घरातला मोठा माणूस हरवल्याचं दु:ख झालं आहे. बाबासाहेबांशी आमच्या घराचे तीन पिढ्यांचे संबंध होते. माझे आजोबा आणि बाबासाहेबांमध्ये सख्खं मैत्र… इतिहासप्रेम, शिवाजीराजांप्रतीची अपार निष्ठा, दुर्गप्रेम या समान धाग्यांनी त्यांना अखेरपर्यंत एकमेकांशी बांधून ठेवलं. त्यांच्यातलं सौहार्द, प्रेम आम्ही अगदी जवळून अनुभवलं आहे. घरी त्यांचं सतत जाणं-येणं असल्यामुळे जन्मापासूनच मला त्यांचा स्नेह मिळाला. सहाजिकच आजोबांबरोबरच त्यांच्या संस्कारांचं शिंपणही माझ्यावर झालं. मी आजोबा आणि बाबासाहेब यांच्याबरोबर अनेक दुर्गभ्रमंती केल्या आहेत. आज त्या सगळ्या स्मृतींचा आठव दाटून येत आहे. त्यावेळी त्या दोघांमधल्या गप्पांनी मला किती समृद्ध केलं हे शब्दात सांगता येणार नाही.