। खोपोली । प्रतिनिधी ।
धाकटी पंढरीत कार्तिक शुद्ध एकादशी निमित्ताने विठ्ठल रूखमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या महामारीमुळे यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासन व ग्रामस्थांनी घेतल्याने भाविकांचा मोठी हिरमोड झाला असला तरी दर्शानासाठी मंदीर खुले ठेवल्यामुळे कार्तिकी एकादशी भक्तांसाठी महापर्वणी ठरली आहे. तर कार्तिकी, आषढी एकादशीला महापूजेचा मान मिळालाच पाहिजे अशी इच्छा व्यक्त करणारे आडोशी गावचे विजय पिलाजी देशमुख यांचा कोरोनात मृत्यु झाला पण मुलगा अक्षय वडीलांची अपूर्ण इच्छा पूर्ण करीत महापूजा केली आहे.
कोरोनाना प्रार्दुभाव लक्षात घेत शासनाच्या नियमांच्या आधिन राहत भाविकांना दर्शनासाठी सोडताना मुख्य प्रवेशद्वार येथे सॅनिटायझर, माक्स वापरणे बंधनकारक ठेवले असून सामाजिक अंतर पाळला जात असल्याची माहिती देवस्थान कमिटीचे सदस्य जयवंत पाटील यांनी दिली आहे. तर मंदीरात गर्दी न होता भाविकांना दर्शन घेण्यासाठी अडचण होवू यासाठी धाकटी पंढरी देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष आर.एस.पाटील, सेक्रेटरी नारायण पाटील, सदस्य अॅड.रामदास पाटील, अतुल पाटील, जयवंत पाटील, संदेश पाटील, व्यवस्थापक मारूती पाटील तसेच सर्व सदस्यांनी उत्तम व्यवस्था केली आहे.
खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांनी मंदीराच्या प्रवेशद्वारासमोरील हार फुलांची दुकाने उठवून मंदीराच्या काही अंतरावर बसण्यासाठी परवानगी देत पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तर खोपोली पालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी आरोग्याच्या दृष्टिकोनात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवत विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.