आणखी 40 जण अडकले असल्याची शक्यता
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील तळई गावामध्ये गुरूवारी सायंकाळी दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे. आज सकाळी येथे एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्याला सुरुवात झाली. आतापर्यंत मातीच्या ढिगार्याखालून 32 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 30 ते 40 जण याठिकाणी अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

तळई गावामध्ये रात्री दरड कोसळल्याची घटना समोर आली होती. या दरडीखाली 30 ते 35 घरे दबल्याची भीती होती. मात्र सर्व पूरपरिस्थितीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने बचावकार्य सुरु करण्यात आले नव्हते.

आज सकाळी पूराचे पाणी ओसरायला लागल्यानंतर याठिकाणी स्थानिकांच्या मदतीने एनडीआरएफ आणि बचावकार्य सुरु करण्यात आले.आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 30 ते 40 जण मातीच्या ढिगार्याखाली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र अधिकृत माहिती देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे.