पाच वर्षांपासून कासवगतीने सुरू
। महाड । प्रतिनिधी ।
महाड-म्हाप्रळ रस्त्याचे काम अपूर्णच या मार्गाचे काम गेली पाच वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. ठिकठिकाणी केलेले खोदकाम आणि जुन्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे परिसरातील नागरीकांना खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून या कामचुकार ठेकेदारांना पाठबळ दिले जात असल्याची चर्चा स्थानिकांमधून होत आहे.
महाड तालुक्यातून म्हाप्रळ-पंढरपूर महामार्ग पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होता. मात्र, सध्या तो महामार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. या महामार्गावरील वरंधा घाट ते म्हाप्रळ दरम्यान असलेला सुमारे 82 किमीचा मार्ग महाड तालुक्यातून जातो. या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण कामाची निविदा सन 2018 रोजी सुमारे 280.42 कोटी रुपयांची काढण्यात आली होती. त्यानुसार हे काम एम.बी. पाटील या ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र, पाटील कंपनीने हे काम न केल्याने शासनाने त्यांच्याकडून ठेका काढून घेतला आणि सन 2021 मध्ये दुसरी निविदा काढली. सुमारे 208.10 कोटी रुपयांची निविदा काढून हे काम अक्षय कंट्रक्शन आणि पी.डी.आय.पी.एल. कंपन्यांना देण्यात आले होते. तिथपासून आजतागायत या रस्त्याचे काम अद्याप कासवगतीने सुरूच आहे.
सध्या महाड तालुक्यातील शिरगाव ते तुडील या जवळपास 9 किमी दरम्यान संपूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे. या टप्प्यामध्ये एक टक्का देखील काँक्रिटीकरणाचे काम झालेले नाही. तुडील गावापासून पुढे साधारण 2 किमी अंतरापर्यंत अत्यंत खराब रस्त्यामुळे डांबरीकरण करण्यात आलेले आहे. पुढे रोहन गावापासून चिंभावेपर्यंत देखील रस्त्याचे काम कमी अधिक प्रमाणात झालेले आहे. वराठी गावापासून पुढे गोमंडीपर्यंत देखील खडी पसरून ठेवण्यात आलेली आहे. गोमेंडी गावापासून म्हाप्रळपर्यंत एकेरी काँक्रीट काम झालेले आहे. राजेवाडी गावापासून वरंधापर्यंत देखील अद्याप टप्प्या टप्प्यात काम सुरु आहे. तीन वर्षांपासून हे काम अशाच पद्धतीने सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासनाचे अभियंता आणि स्थानिक लोकप्रतिनिधी देखील अशा कामचुकार ठेकेदारांना पाठबळ देत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.
आधुनिक यंत्रणा वापरून देखील महाड शिरगाव ते म्हाप्रळ या फक्त 24 किमी अंतराला 5 वर्ष लागली आहेत. अशाच पद्धतीत मुंबई-गोवा महामार्ग व महाड-रायगड मार्ग हे रस्ते देखील रखडले आहेत. या अभियांत्रिकी शिक्षण घेऊन आलेल्या अभियंत्यांचा आणि एकाच वेळेस अनेक ठिकाणी काम घेणार्या ठेकेदारांचा उपयोग काय, असा संतप्त प्रश्न देखील नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
20 किलोमीटरमध्ये डांबरीकरण
म्हाप्रळ-पंढरपूर या मार्गामध्ये महाड औद्योगिक वसाहतीमधून बाहेर पडणारे सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी आहे. या जलवाहिनीच्या स्थलांतराकरिता सुमारे 150 कोटी रुपये अपेक्षित असल्याने महामार्ग विभागाने जलवाहिनीचे स्थलांतर रद्द करून या 20 किलोमीटर अंतरामध्ये डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. काँक्रिटीकरणाचे काही टक्केच काम झालेले असताना डांबरीकरण काम मात्र अल्पावधीत पूर्ण झाले आहे. मात्र, त्यात देखील 20 किमी पेक्षा कमी अंतरामध्ये डांबरीकरण झाल्याचे दिसून येत आहे.