| अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्याचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत, या हेतूने आयोजित केलेल्या रविवार दि.30 एप्रिल रोजी जिल्हयात झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दालल अशी एकूण 16 हजार 339 प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल अ. शिंदे यांनी माहिती दिली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयांत वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एन. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील वादपूर्व प्रकरणे व प्रलंबित अशी एकूण 89 हजार 119 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी वादपूर्व प्रकरणे 14 हजार 875 व प्रलंबित प्रकरणांपैकी एक हजार 464 प्रकरणे अशी एकूण 16 हजार 339 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली व त्याव्दारे पक्षकारांना एकूण 13 कोटी 38 लाख 72 हजार 156 रुपयाची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. नऊ जोडप्यांचा लोक अदालत मध्ये संसार जुळला. त्यांना न्यायाधीशांनी पुष्पगुच्छ देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करून सुद्धा प्रकरणे मिटविण्यात आली.
या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड, पोलीस अधीक्षक रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सावंत व न्यायाधीश तथा सचिव अमोल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.