| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील घोडगाव, गावठेवाडी, नवेवाडी, भागाची वाडी, ओवळ्याची वाडी, येथील ठाकूर आदिवासी समाज बांधवांनी चिखलगाव ते घोडगाव या मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेसह वाड्यांमधील अनेक नागरी समस्या बाबत संतप्त आदिवासी बांधवांनी शुक्रवारी (दि.24) पाली तहसील कार्यालयावर धडक देत निवासी नायब तहसीलदार भारत फुलपागारे यांना आपल्या समस्या बाबतचे निवेदन दिले.
याप्रसंगी सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थेचे अध्यक्ष गोविंद लेंडी उपाध्यक्ष चंद्रकांत वरगुडे, ताया सिंगवा, मारुती डोके, महादू दोरे, धर्मा सिंगवा, चाऊ सिंगवा, परशुराम दोरे चंद्रकांत सिंगवा सुभाष सिंगवा जानू सिंगवा अनंता सिंगवा जानू मेंगाळ, आदी ग्रामस्थ शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आदिवासी बांधवांनी नायब तहसीलदार यांना सांगितले की आमच्या समस्यांचे संबंधित विभागाकडून तत्काळ निवारण करावे अन्यथा आम्ही सर्व आदिवासी बांधव आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार याला सर्वस्वी जबाबदार उदासीन प्रशासन आणि राजकीय पुढारी असतील, असा इशारा आदिवासी बांधवांनी दिला.
गेली अनेक वर्षापासून सुधागड तालुक्यातील आमचे आदिवासी ठाकूर समाज बांधव शासकीय तसेच नागरी सुविधापासून वंचित आहेत. ठाकूर वाड्यांना रस्ते नसल्यामुळे आजारी तसेच गरोदर बायकांना झोली करून शहराचे ठिकाणी घेऊन जावे लागत आहे. निवडणुकांतून फक्त आश्वासन दिली जातात कामाची पूर्तता होत नाही. त्यामुळे या वाड्यांमधील ग्रामस्थांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार उदासीन प्रशासन आणि निष्क्रिय राजकीय पुढारी आहेत.
– गोविंद लेंडी,
अध्यक्ष,
सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्था सुधागड
आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या
मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
गटारे नसल्याने वाड्यांमध्ये दुर्गंधी
स्मशानभूमीसह स्मशानभूमी रस्त्यांची दुरवस्था
व्यायाम शाळेसह अंगणवाडीची दुरवस्था
महावितरणच्या विद्युत वाहिन्यासह पोलची दुरवस्था







