| कर्जत | प्रतिनिधी |
कोकण ज्ञानपीठ कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल, कर्जत पोलीस ठाणे व समर्थ मोटार ट्रेनिंग स्कूलच्या सहकार्याने कर्जत शहरात प्रभात फेरी काढून शहरातील चौका-चौकात पथनाट्य सादर करून वाहने चालवताना कशी काळजी घ्यायची याबाबत जनजागृती केली.
कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, मोटर वाहन निरीक्षक अजय कराळे, प्रा. संजय पाटील, प्रा. प्रवीण नेलपगारे, अनिल घरत, अर्चना दगडे, निलेश मराठे, अभिजीत मराठे आदी उपस्थित होते. सुरेंद्र गरड यांनी, ‘रस्ता अपघात’ होण्याची मुख्य कारण व वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे. याविषयी विद्यार्थ्यांना संबोधित केले. अजय कराळे यांनी, वाहन चालवताना आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपल्याबरोबरच समोरच्या वाहन चालकांचेही नुकसान होते. प्रसंगी प्राणावर बेतते, वाहनांचा अति वापर केल्यामुळे अपघात व प्रदूषण होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाहन कायम सुस्थितीत असावे. याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले.
दरम्यान, सुरेंद्र गरड यांनी प्रभात फेरीला हिरवा झेंडा दाखविला. ही प्रभात फेरी कर्जत शहरातून येत असताना घोषणा दिल्या व चौका-चौकात विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे वाहने सुरक्षित कशी चालवायची? हेल्मेटचा वापर किती महत्त्वाचा आहे? आदी विषयांवर जनजागृती केली.