। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मोर्चा च्या वतीने अलिबाग शहरात जनआक्रोश रॅली काढण्यात आली होती. रायगड संघटक विजय आवासकर, दक्षिण रायगड अध्यक्ष राकेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये राम सावंत, मिलिंद साळवी, वासुदेव भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या जनआक्रोश रॅलीला प्रारंभ करण्यात आला. अलिबाग शहरात घोषणाबाजी करीत निघालेल्या या रॅलीचे विसर्जन जोगळेकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. यावेळी रायगड संघटनक विजय आवासकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी सांगितले की, भाजपा सरकारने कारस्थान करीत कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन घोषीत करीत जनता आणि शेतकर्यांना घरात डांबून ठेवले. आणि याचा गैरफायदा घेत शेतकरी विरोधी विधेयक आपल्या बहुमताच्या जोरावर विरोधकांचा विरोध डावलत मंजूर करुन घेतले. लॉकडाऊनमुळे होणारा विरोध आधीच मोडून काढण्याचा त्यांचा हा डाव होता. मात्र हा कुटील डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही असेही आवासकर यांनी ठणकावून सांगितले. यावेळी दक्षिण रायगड अध्यक्ष राकेश मोरे यांनी देखील मार्गदर्शन करीत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टिका केली.