राजकीय वधाच्या भीतीनेच राणे सैरभैर

हरी खोबरेकर यांची टीका
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
आ. वैभव नाईक हे कलियुगातील श्रीकृष्ण असून, आगामी निवडणुकीत त्यांच्या हातून राजकीय वध होण्याच्या भितीनेच निलेश राणे हे सैरभैर झाले असल्याची टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे. मालवण येथे शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी पालिकेचे बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक पंकज सादये, गणेश कुडाळकर, मंदार ओरसकर, दीपा शिंदे, किसन मांजरेकर, सन्मेश परब, आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
हरी खोबरेकर म्हणाले की, निलेश राणे यांची भाषाशैली सर्वश्रुत आहे. त्यामुळेच त्यांच्या नावासमोर माजी खासदार ही बिरूदावली जनतेनेच लावली आहे. आ. वैभव नाईक मतदार संघातील घराघरात पोचले आहेत. जनता आणि कार्यकर्त्यांशी विनम्रपणे वागताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याबरोबरच जनतेच्या हक्कासाठी सत्तेत राहूनही रस्त्यावर उतरण्याची धमक आजपर्यंत अनेक वेळा आमदार नाईक यांनी दाखवली असल्याचे मत खोबरेकरांनी व्यक्त केले आहे.
याशिवाय, लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा पराभूत झालेले निलेश राणे जनतेतून दोन वेळा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीवर आरोप करतात, हे हास्यास्पद आहे. केवळ स्वतःच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी ते अशाप्रकारची बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोपही खोबरेकर यांनी केला आहे.

Exit mobile version