। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दोन वर्षांच्या सुटकेनंतर सर्वकाही पुर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोकेवर केेले आहे. देशभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने स्वातंत्र्यदिनाच्या समारंभासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ नये, असे आवाहन केंद्रामार्फत करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.
दररोज सरासरी 15 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद होत असल्याने मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जावे,असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. याबाबत सर्व राज्यांना मार्गदर्शक तत्वे पाठविण्यात आली आहेत. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून व्हीआयपींनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे टाळावे.
प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी स्वच्छ भारत मोहीम राबवावी. ही मोहीम महिनाभर सातत्याने सुरु ठेवावी. सरकारी विभाग, शैक्षणिक संस्थांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण कार्यक्रम राबविणे, आदी तत्वे निश्चित करण्यात आली आहेत.