भाताचे कोठार नामशेष होण्याच्या मार्गावर

2000 हेक्टर उन्हाळी भातपिकाचे क्षेत्र घटले

| माणगाव | प्रतिनिधी |

डोलवहाळ बंधार्‍याच्या कालव्यावरील पाण्यावर भातशेतीत मोठ्या प्रमाणात माणगाव तालुक्यात पिकत होती. यापूर्वी 2500 हेक्टरवरून 2100 हेक्टरवर भातशेती पिकवली जात होती. त्यानंतर यंदाचे वर्षी भातशेतीच्या क्षेत्रात कमालीची घट झाली असून, हे क्षेत्र यंदा माणगाव तालुक्यात कालव्याच्या पाण्यावर 102 हेक्टरवर भातपिकाची लागवड केली आहे. त्यामुळे आगामी काळात माणगाव तालुका भातासाठी भुकेलेला राहणार आहे. दरम्यान, भातपिकाचे क्षेत्र घटत असताना नगदी पिके घेण्याकडे मात्र शेतकर्‍यांचा कल वाढत आहे.

या घटलेल्या भातशेतीमुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांना बाजारपेठेतील भातावर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र अनेक नागरिक आजही स्थानिक शेतकर्‍यांकडील कसदार असणारा तांदूळ खरेदी करतात. हे क्षेत्र घटल्याने गुरांच्या चार्‍याचाही प्रश्‍न ऐरणीवर आला असून, एकेकाळी माणगाव हे भात उत्पादनाचे कोठार होते. ती ओळख आता काहीअंशी पुसट होत चालली आहे.  

डोलवहाळ बंधारा उभारणीपूर्वी या तालुक्यातील सुमारे दीडशे ते दोनशे गावांतील नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट मैलोन् मैल करावी लागत होती. खरीप हंगामानंतर शेतकर्‍यांना अन्य रोजगाराचे साधने नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील तरुण-तरुणी मुंबई येथे स्थलांतरीत होऊन चाकरी करीत होते. मात्र, डोलवहाळ बंधार्‍यामुळे शेकडो गावांच्या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळाली असून, अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. तर, ही एक पिकी शेती दुपिकी झाली. यामुळे अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघाला असून, दुपिकी शेतीलाही संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे दुबार शेतीची माणगावच्या उत्पन्नात भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सक्षम होत आहे.

सह्याद्रीच्या कड्या कपारीमध्ये वसवलेल्या या तालुक्यात प्रामुख्याने कुणबी समाजाचे लोक पारंपरिक पद्धतीने पिढ्यान् पिढ्या शेती करत असत. सुमारे 300 ते 400 सें. मी. एवढे वार्षिक पर्जन्यमान असताना केवळ भाताचे एकच पीक घेतले जात असे. साहजिकच, फक्त भातपिकावर येथील शेतकरी कुटुंबाची गुजराण करीत होता. रोहा तालुक्यातील डोळ्वाहाळ येथे काळ प्रकल्प उभारल्यामुळे काळ प्रकल्पाचा शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. माणगाव तालुक्यातील 76 व रोहा तालुक्यातील 48 गावांना उन्हाळी हंगामासाठी सिंचनासाठी पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची शेती दुबार झाली होती. मात्र, भातपिकावर निव्वळ अवलंबून न राहता नगदी पिकाकडे शेतकरी वळत आहे. तसेच काही शेतकर्‍यांनी शेती करणे सोडून दिल्यामुळे भातपिकाच्या शेतीवर संक्रांत आली आहे.

नगदी पिकाच्या क्षेत्रात वाढ
माणगाव तालुक्यात दरवर्षी 2100 हेक्टर क्षेत्रावर भातशेती पिकवली जात होती. यंदाचे वर्षी या भातपिकाच्या क्षेत्रात घट झाली असून, 102 हेक्टरवर भातपीक शेतकरी घेत आहेत. भातपिकाचे क्षेत्र कमी झाले असून, कलिंगड क्षेत्र 125 हेक्टर, भाजीपाला क्षेत्र 883 हेक्टर, कडधान्ये 1591 हेक्टरवर पिकवले आहे. तर, नगदी पिकाचे क्षेत्र 2599 हेक्टर झाले आहे. यावरून नगदी पिके घेण्याकडे शेतकरी मोठ्या प्रमणात कल दिसत आहे.

असे होते पाण्याचे वितरण
सन 1976 पासून प्रत्यक्ष सिंचनास सुरुवात झाली. काळ प्रकल्पांतर्गत कालव्याच्या लांबीचे क्षेत्र कुंडलिका उजवा तीर कालवा 288 कि.मी., कुंडलिका डावा तीर कालवा 10 कि.मी., रोहा शाखा 21 कि.मी., मोर्बा शाखा 33 कि.मी., माणगाव शाखा 32 कि.मी., गोरेगाव शाखा 12 कि.मी., अंबा कालवा अशा प्रकारे वेगवेगळ्या कालव्यांतून त्यांच्या वितरिकांमार्फत अगदी शेत ते शेत पाणी पुरवठ्याचे सिंचित केले जात आहे.

Exit mobile version