| महाड | प्रतिनिधी |
गेले दोन दिवस सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसाने महाडमधील सावित्री नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीय वाढल्याने शहरवासिय सतर्क झालेले आहेत. खबरदारी म्हणून व्यापार्यांसह नागरिकांनी आता साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे. रबरी बोटीही तैनात करण्यात आल्या आहेत.
पावसाचा जोर दिवसभर अखंड होता. त्यामुळे सावित्रीच्या पाण्यात कमालीची वाढ होत आहे. याची दखळ घेत प्रशासकीय यंत्रणेसह एनडीआरएफ पथक परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत. सातत्याने भोंगे वाजवून नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकही आपले जीवनाश्यक साहित्य सुरक्षित ठिकाणी नेत असल्याने शहरात एकप्रकारे भीतीचे वातावरणही पसरले आहे.गेल्या वर्षी आलेल्या महापुराची दखल घेत सर्वजण सावधपणे वावरत असल्याचे जाणवत आहे.
दरम्यान, हवामान विभागानेही रायगडसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर असाच राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एनडीआरएफची टीम दाखल
आपत्ती काळात तत्काळ मदतकार्य सुरु करता यावे यासाठी 4 महिने एनडीआरएफची टीम महाड येथे तैनात करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात आली असुन एनडीआरएफची 25 जणांची टीम सोमवारी (4 जुलै) महाडमध्ये दाखल झाली. यामुळे दिलासा मिळाला आहे. महाड शहरासह संपूर्ण तालुक्यावर पावसाळ्यात पूर, दरड कोसळणे अशा आपत्तीची टांगती तलवार असते. गतवर्षी महाड शहर व तालुक्यात महापूराने थैमान घातले होते. तर तळीये येथे दरड कोसळून 87 जणांचे बळी गेले होते. रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सातत्याने नैसर्गिक आपत्ती होत असते .यामध्ये महाड व पोलादपूर तालुके हे आपद्ग्रस्त तालुके म्हणून ओळखले जात आहेत. अनेकदा आपत्तीनंतर तातडीने मदत कार्य मिळत नसल्याने तसेच मदत कार्यामध्ये मर्यादा येत असल्याने एनडीआरएफचे पथक मागवावे लागते, पथक दाखल होईपर्यंत विलंब होत असल्याने मोठी हानी होत असते. त्यामुळे महाड येथे एनडीआरएफचा बेसकॅम्प असावा अशी मागणी नागरिकांसोबत लोकप्रतिनिधींनी देखील केली होती.त्यामुळे महाड येथे एनडीआरएफचे बचावपथक कायमस्वरुपी असावे या मागणीला राज्य सरकार बरोबरच आता केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.
महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी शासकीय दूध योजना येथील 2.57.46 हेक्टर आर. इतके क्षेत्र राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांना कायमस्वरुपी बेस कॅम्प तयार करण्यासाठी उपलब्ध दिले आहे.
पुढील दोन तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असून एनडीआरएफची टिम आज महाडमध्ये दाखल झाली आहे. 25 जणांची टिम आता पुढील दोन महिने महाड शहरात तळ ठोकणार आहे.याp टिमचे प्रमुख बी. महेश यांच्याशी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड व तहसिलदार सुरेश काशिद यांनी चर्चा करून तालुक्यातील दरडग्रस्त गावांची माहिती घेतली. त्याच प्रमाणे मंगळवारपासून या टीमचा तालुक्यातील दौरा निश्चित करण्यात आला आहे. या टिमची राहण्याची व्यवस्था संत रोहीदास सभागृह येथे करण्यात आली आहे.या टीम सोबत महाड नगर परिषदेची टीम, त्याच बरोबर साळुंखे रेस्क्यु टिम देखील आपत्ती काळात मदती साठी असणार आहे.याच बरोबर जिल्हा प्रशासनाकडून बचाव साहित्य पुढील आठवड्यात प्राप्त झाल्यानंतर त्याचे तातडीने गरजेनुसार वाटप करण्यात येईल प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी सांगितले.