। रायगड । प्रतिनिधी ।
हिवाळ्यात शाळा-महाविद्यालयातून मोठ्या प्रमाणात सहली काढल्या जातात. यासाठी गडकिल्ल्यांना अधिक पसंती दिली जाते. शैक्षणिक सहलीसाठी जाणारे विद्यार्थी हुल्लडबाजी करीत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्व निकषांचे काटेकोर पालन केल्याचे निश्चित झाल्यानंतरच शाळांना सहली काढता येणार आहेत. यामुळे शैक्षणिक सहलींदरम्यान घडणार्या अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा शिक्षण विभागाकडून केला जात आहे.संबंधित शाळांनी गटशिक्षण अधिकार्यांना परवानगीचे पत्र दिल्यानंतर ते शिक्षणाधिकार्यांना पाठवणे आवश्यक आहे. सहलीची परवानगी घेताना नियमांचे पालन केले जाईल, असे बाँडपेपरवरील हमीपत्र शाळांच्या मुख्याध्यापकांकडूनच घेण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची हमी आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनाबद्दल कोणतीही शाश्वती घेण्यास शैक्षणिक संस्था तयार नसल्याने शैक्षणिक सहलींमध्ये शिस्त आल्याचे दिसून येत आहे.साधारण नोव्हेंबरपासून शैक्षणिक सहलींना सुरुवात होते. याचे नियोजन आधीपासून शैक्षणिक संस्था करतात. यासाठी शिक्षण विभागाची परवानगी, प्रवासासाठी एसटी गाडीचे बुकिंग करावे लागते; मात्र या वर्षी अशा परवानग्यांचे प्रमाणच अत्यल्प आहे. काही वर्षांपूर्वी मुरूडच्या समुद्रकिनार्यावर सहलीला गेलेल्या पुणे येथील अबिदा इनामदार महाविद्यालयातील 14 विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याचबरोबर दोन वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर आलेले विद्यार्थी वाट चुकले होते. जंजिरा किल्ला, कुलाबा किल्ला पाहण्यासाठी येणार्या विद्यार्थ्यांना दुखापतीला सामोरे जावे लागले होते. किल्ले रायगडावर पायरी मार्गाने जाणार्या सहलींमधील विद्यार्थ्यांना त्रास जाणवत असतो. इनामदार महाविद्यालयाच्या दुर्घटनेनंतर सहलीच्या आयोजनासंदर्भात शिक्षण उपसंचालकांनी परिपत्रक जारी केले होते. यात टप्प्याटप्प्याने अनेक सुधारणा झाल्या.
रायगड जिल्ह्यातील शाळांच्या शैक्षणिक सहली जशा बाहेर जातात त्याहीपेक्षा जास्त बाहेरील शैक्षणिक सहली रायगडमध्ये येत असतात. किल्ले रायगड, मुरूड येथील जंजिरा किल्ला, कुलाबा, कर्नाळा, सरसगड असे अनेक गडकिल्ले रायगडमध्ये आहेत. त्याचबरोबर अलिबाग, दिवेआगर, मुरूड, श्रीवर्धन येथील समुद्रकिनार्यांवर सागरी जीवांचा अभ्यास करण्यासाठी शैक्षणिक सहली आणल्या जातात; मात्र अनेक वेळा विद्यार्थी हुल्लडबाजी करीत असल्याने दुर्घटना घडण्याचे प्रकार घडत असतात.
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, रक्तगट, नातेवाइकांचा मोबाईल क्रमांक अशी माहिती घेतली जाते. ज्या शाळा सर्व अटींचे पालन करण्याची हमी देतात, त्यांना परवानगी दिली जाते. हे पत्र गटविकास अधिकार्यांकडून आमच्याकडे येते. नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली आहे, हे निश्चित झाल्यानंतरच परवानगी दिली जाते. शिक्षण विभाग गांभीर्याने घेत असल्याने काही वर्षांपासून शैक्षणिक सहलींमध्ये अपघातांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.
पुनिता गुरव,
प्राथमिक शिक्षणाधिकारी, रायगड.
आवश्यक परवानग्या शिक्षणाधिकार्यांची अनुमती, प्राचार्यांचे शिफारसपत्र, पालकांचे संमतिपत्र, मुख्याध्यापकांचे स्टॅम्पपेपरवरील हमीपत्र, विद्यार्थ्यांची यादी, पालकांचे संपर्क क्रमांक, व्यवस्थापनाची परवानगी, विद्यार्थ्यांच्या विम्याचा तपशील, सहलीचे एकूण अंतर कालावधी, मार्गप्रथमोपचार पेटी, विद्यार्थी रक्तगट माहिती.
