| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टी-20 विश्वचषक 2024 सुरु व्हायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ यंदाचा टी-20 विश्वचषक खेळणार आहे. काही महिन्यांपूर्वी झालेला एकदिवसीय विश्वचषकादरम्यान भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्या जखमी झाला होता. त्याचबरोबर त्याला मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद दिल्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. विश्वचषकासाठी घोषणा करण्यात आलेल्या खेळाडूंवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावेळी हार्दिक पांड्याच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले जात होते की, हार्दिक पांड्याची निवड दबावाखाली करण्यात आली आहे, पण या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे? या प्रश्नाचे उत्तर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिले आहे.
जय शाह यावेळी ते म्हणाले की, खेळाडूंची निवड केवळ आयपीएल कामगिरीच्या आधारे केली जात नाही. याशिवाय इतरही अनेक बाबी विचारात घेतल्या होत्या. विशेषत: एखाद्या खेळाडूला किती आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. हार्दिक पांड्या दबावाखाली निवडले गेल्याचे सर्व दावे त्याने फेटाळून लावले. तसेच, जय शाह यांनी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाबाबत आपले मत व्यक्त केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ उत्कृष्ट आहे. अनुभवी खेळाडूंशिवाय युवा खेळाडूंचा चांगला मेळ आहे असे त्यांनी सांगितले.