विशल्या नर्मदा सेवा समितीचा उपक्रम
बोर्लीपंचतन | मकरंद जाधव |
भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात.नद्यांच्या दैवी प्रभावाची जाणीव आपल्या पूर्वजांना असल्यामुळे नद्यांबद्दल पूज्यभावना, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा आपल्या भूमित चालत आलेली आहे.अर्थात हे सर्व व्यक्त करण्याच्या विविध प्रथा आणि परंपरा आहेत. अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पृथ्वीतलावरची एकमेवाद्वितीय परंपरा म्हणजे नर्मदा परिक्रमेची !
नर्मदा मातेचे तमाम भक्त अखंड श्रद्धा ठेऊन नर्मदा मातेची परीक्रमा करतात. परिक्रमा केल्यावर त्यांच्या मनात नर्मदा मातेविषयी एक उत्कट भावना जागृत होते. त्याच भावनेतून भक्तगण आपल्या इच्छेनुसार नर्मदा खंडात सेवा कार्य करुन या जीवन वाहीनी नर्मदा मातेचे ऋण फेडण्याचा आपल्या परीने प्रयत्न करीत असतात.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नर्मदा मातेचे भक्त नर्मदा खंडात येऊन गेली अनेक वर्षे सेवाकार्य करीत आहेत.या कार्याचा अधिक प्रमाणात विस्तार होण्यासाठी सेवा ही परमोधर्म या भावनेने त्यांनी विशल्या नर्मदा सेवा समिती नावाने स्वयंसेवी संस्थेची स्थापन केली आहे. विशल्या म्हणजे शल्य दूर करणारी माता असा नर्मदा मातेचा पुराणात उल्लेख आहे या समितीच्या फलकाचे अनावरण नुकतेच महेश्वर येथील नर्मदा मातेच्या तीरावरील सप्त मातृका आश्रमात स्वामी श्री.समानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते झाले.यावेळी विशल्या नर्मदा सेवा समितीच्या वतीने तीरावरील साठ गोरगरीब कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करून सेवा सुरु करण्यात आली.यावेळी समितीचे अध्यक्ष योगेंद्र पुजारी,उपाध्यक्ष ऋषीकेश ओझा,सचिव आशिष देशमुख,सतीश सराफ आणि प्रसाद खुंटे उपस्थित होते नर्मदा परिक्रमेतील रहिवाशांच्या सेवेबरोबरच नर्मदा माईच्या काठावरील स्वच्छता अभियान,गरीब अनाथ मुलांचे शिक्षण आणि संगोपन करणे हे समितीचे मुख्य उद्दिष्ट असेल असे गेली दहा वर्षे नर्मदा किनारी सेवाकार्य करणारे समितीचे उपाध्यक्ष ऋषीकेश ओझा यांनी सांगितले.