एमएसआरडीसीचे दुर्लक्ष;व्यापारी, वाहनचालक त्रस्त
। पनवेल । वार्ताहर ।
आशिया खंडातील सर्वाधिक मोठा मानला जाणारा कळंबोली लोखंड पोलाद बाजार प्राचार्य मुख्य प्रवेशद्वारावरच मोठ मोठे खड्डे पडून बाजूच्या गटाराचे पाणी साचले आहे. मार्केटच्या चौकातच खड्ड्यात पाणी साचून तळे स्वरूप आले आहे. यामुळे बाजारातील व्यापारी, वाहन चालक त्रस्त झाले आहेत. शासनाने पाण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याची मागणी व्यापारी संघटनांकडून केली जात आहे. मात्र, या मुख्य समस्याकडे एमएसआरडीसीचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
असलेल्या पाण्याबाबत व खड्ड्यांबावत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पनवेल तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांनी लेखी पत्रव्यवहार दुरुस्ती करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. या मार्केटमध्ये टोल टॅक्स ही तितकाच वसूल केला जात आहे. मात्र एमएसआरडीसीचे या मुख्य समस्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने व्यापार्यांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत पनवेल महापालिकेचे प्रभाग अधिकारी सदानंद कवठे यांनी पत्रव्यवहार करून सदरची बाब निदर्शनास आणून दिली आहे. एमएसआरडीसीच्या अधिकारी कोटकर मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परमार कन्स्ट्रक्शन शी संपर्क करा असे सांगितले.
परमार कन्स्ट्रक्शन कंपनीशी संपर्क साधला असता तेथील अभियंते म्हणाले की कळंबोली जवळील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी जमिनीखाली खाली फुटल्याने सदरचे पाणी तिथे येत आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी पत्रव्यवहारही केला गेला आहे. जोपर्यंत पाण्याची गळती थांबवली जात नाही, तोपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम करता येत नसल्याचे सांगितले.