उच्च न्यायालायचा निकाल
मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केलं आहे. 2013 मधील या प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. घटना घडली तेव्हा लोकांचा रोष अधिक होता. पण कायद्याचा विचार करता हे प्रकरण फाशीचे नाही असं कोर्टाने यावेळी नमूद केलं.
आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयाने 4 डिसेंबर 2014 ला या सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. आरोपींची शिक्षा निश्चित करण्यासंबंधीचा निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला होता. दरम्यान आज निर्णय सुनावताना कोर्टाने फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्याचा निर्णय दिला.
शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या तिघांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती.
फाशीची शिक्षा रद्द करताना आम्ही प्रक्रियेचं पालन केलं आहे, असं कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं. आरोपी जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत. महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहणारे हे आरोपी नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत.असेही निकालात नमूद केले आहे.