| मुंबई | प्रतिनिधी |
वर्धापन दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, त्यांच्यासाठी लक्ष द्यावे लागेल. समाजासाठी काम करणाऱ्यांना हा देश माझा आहे, असं वाटणारा राज्यकारभार चालला पाहिजे, पण त्याची पूर्तता होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये बसू, उपेक्षित समाजाचे प्रश्न एकत्र येऊन सोडवू. आवश्यकता असेल तर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना योग्य दिशा दाखवू. त्यांनी आपलं म्हणणं स्वीकारलं नाही तर संघर्ष करू, अशी घोषणा शरद पवार यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्राम बुधवारी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. खतासाठी शेतकऱ्यांची लाईन लागली आहे. रात्र रात्र खत मिळत नाही. खताच्या दुकानाबाहेर शेतकरी झोपले आहेत. ही अवस्था आहे. आज शेतकरी संकटात आहे. कर्जबाजारी आहे. कालच एक यादी आली. आठ दिवसांत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची माहिती त्यामध्ये आहे. या सत्ताधाऱ्यांना घामाची किंमत कळत नाही, म्हणून हा शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.
आज जगात अनेक संकट येत आहेत. गेले काही महिने इराण आणि इतर देशांचं युद्ध सुरू आहे. भारताचं वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये ज्या देशांवर अन्याय होतो, त्या देशांना मदत करण्याचं आहे. आता ईराणवर हल्ले होत आहेत. आतापर्यंत आपलीजी परराष्ट्र नीती होती, ती आता सांभाळली जात नाही. त्यामुळे आता थांबायचं नाही, कामाला लागायचं, राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही, ही भूमिका कर्तृत्व आणि कष्टाने दाखवून द्यायची आहे, असं आवाहानही शरद पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केलं आहे.





