। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्रात अलीकडेच राजकीय समुद्रमंथन झाले आहे. त्यातून जे विष होते, ते निघून गेले आहे. आता जे काही अमृत उरले आहे, ते आगामी निवडणुकीत शेकापला मिळेल, असा विश्वास रायगड जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक करताना त्यांनी वर्षभरातील शेकापच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. जनतेच्या विविध प्रश्नांवर शेकापने सातत्याने आवाज उठविला असून, जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही केले आहे, असे ते म्हणाले. वर्षभरात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये पक्षाला जे यश मिळाले आहे, त्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच ज्यांना ज्यांना विविध पुरस्कार मिळाले, त्याबद्दल त्यांचेही त्यांनी आभार मानले. अल्पावधीत पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाची तयारी करण्यात माजी आ. धैर्यशील पाटील यांच्यासह पेण तालुका चिटणीस मंडळाने केलेल्या सहकार्याबद्दलही आस्वाद पाटील यांनी धन्यवाद दिले.