पाच जागांवर तोडगा निघेल
| मुंबई | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीचे वातावरणाच्या तापायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षातील जागा वाटपावरील नाराजी थांबायचे नाव घेत नाही. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत मंत्री आणि आमदारांनी महायुतीतील घटक पक्षांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीमधील अंतर्गत कलह टाळून एकोप्याने कामाला लागा, अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलविलेल्या बैठकीला शिवसेना पक्षाचे मंत्री, प्रमुख नेते, कोअर कमिटीतील सदस्य आणि आमदार उपस्थित होते. कोणते मतदारसंघ शिवसेनेकडे असावेत? उद्या तेथील परिस्थिती काय असेल? याबाबत आढावा घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा केली. काही मतदारसंघात महायुतीतील इतर पक्ष दावा करत आहेत. त्या मतदारसंघावर आग्रही भूमिका पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आली. आपण जो आदेश द्याल त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे कोअर कमिटी सदस्य आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी आश्वासन दिले. लोकसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जात असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या तीनही पक्षांना स्थानिक स्तरावरील ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत समन्वय ठेवायचा आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या उद्देशानं महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याबाबतच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत, असे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.
महायुतीतील इतर मित्रपक्ष युतीचा धर्म पाळत नसल्यानं बैठकीत मंत्र्यांनी आमदारांनी नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना संजय शिरसाठ म्हणाले की, काही प्रमाणात कुरबुरी आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होईल. या बैठकीत सूचना आणि तक्रारी यावर सविस्तर चर्चा होईल, असे पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच यापुढे कोणीही एकामेकांविरोधात बोलणार नाही, याची काळजी घ्या, अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. विद्यमान खासदारांना पक्षाकडून तिकीट देण्यात आले नाही. त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी बैठकीत दिले. तसेच लवकरच शिवसेनेच्या सर्व आमदारांची आणि जिल्हाप्रमुख यांची बैठक बोलवण्यात येणार आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेतील मंत्री आणि आमदार आग्रही आहेत. याविषयीचा तोडगा येत्या एक-दोन दिवसात निघेल, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.