श्रीवर्धन रस्ता रूंदीकरणाला वेग

अरुंद रस्त्यावरील धोकादायक प्रवास टळणार

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील अनेक राज्यमार्ग व जिल्हामार्गाचे रुंदीकरण झाले. मात्र, गेली कित्येक वर्ष श्रीवर्धन-बोर्लीपंचतन सरळ मार्गावर दांडगुरी ते बोर्ली दरम्यान, अरुंद रस्ता असल्याने येथील प्रवास धोकादायक ठरत होता. मात्र, सातत्याने मागणी होताच रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

श्रीवर्धन-बोर्ली मार्ग हा 17 किमी अंतराचा घाट आणि वळणावळणाचा मार्ग आहे. यामधील बोर्ली ते दांडगुरी दरम्यानचा अंदाजे पाच किलोमीटर रस्ता अरुंद असून, याची रुंदी आठ ते दहा फुट एवढीच आहे. त्यात रस्त्याच्या साईडपट्टीला नेटवर्क केबलसाठी व इतर खोदकाम केल्याने उन्हाळी येथील प्रवास अवघड बनायचा. तर पावसाळी रस्ता चिखलाने माखलेला असल्याने वाहनांचा प्रवास मोठा जिकरीचा ठरत होता. दुचाकी, रिक्षा अशा वाहनाना प्रवास करताना समोरून येणाऱ्या अवजड वाहनाना साईड देतेवेळी रस्त्याच्या खाली किती उतरायचे यावरून ये जा करणाऱ्या दोन्ही वाहन चालकामध्ये पदोपदि वाद होण्याच्या घटना घडतच होत्या. अशावेळी अपघातालाहि सामोरे जावे लागायचे. रस्त्यांच्या या ठिकाणी साईड पट्टी खचल्याने व पडलेल्या खड्डय़ामुळे दुचाकी वाहनचालकांचे वारंवार अपघात घडत असत. मागील दिवसात किमान सहा ते सात वाहनांची साईड पट्टीवरून घसरून जखमी होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून या ठिकाणाहून वाहने चालावी लागत असे.

प्रवासात आणखी कोणता अनर्थ घडू नये म्हणून रस्त्याची डागडुजी व रुंदीकरनाची मागणी प्रवाशी व वाहन चालकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे आता अरुंद रस्त्यावरील धोकादायक प्रवास टळणार आहे. अखेर या रस्त्यासाठी अर्थ संकल्प बजेटमधून मंजुरी मिळाली असून, बोर्ली ते दांडगुरी दरम्यान दोन किलोमीटर अंतरात 2 कोटी 75 लक्ष निधीचा वापर होऊन रस्त्याचे नूतनीकरण होणार आहे. तर पुढील तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रूंदीकरणासाठी 3 कोटी 50 लक्ष एवढा निधी वापरण्यात येणार आहेत.

मागणी नुसार या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. लवकरच तीन ते चार किलोमीटर अंतराचे रुंदीकरण व नूतनीकरण होईल.

तुषार लुंगे,
उपविभागीय अधिकारी,
सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धन
Exit mobile version