वाट दिसू दे देवा वाट दिसू दे, मुबंई गोवा महामार्गारील परिस्थिती, वाहन चालकांसह प्रवाशी वर्ग हैराण
गोवे- कोलाड | विश्वास निकम |
मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. तसेच कोलाड नागोठणे दरम्यानच्या महामार्गावरून प्रवास करतांना रस्ता तुला शोधू कुठे? वाट दिसू दे देवा,वाट दिसू अशीच बोलण्याची वेळ आली असुन या महामार्गावरून प्रवास करतांना रस्त्याला पडलेल्या खड्डयांमुळे रस्ताच गायब झाला असे चित्र पहावयास मिळत आहे.
मुंबई गोवा महामार्ग हा तर चक्क प्रवासी वर्गाच्या जीवावरच बेतला असल्याचे दिसून येत आहे.या मार्गावर खांब, पुगाव, सुकेळी खिंड,वाकण,नागोठणे या महामार्गाच्या मधोमध भले मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यात वाहने आदळून मोठे आपघात होत आहेत.तर अनेक वाहनांचे टायर पंम्पचर होऊन प्रवाशी वर्गाचा खोळंबा होत असतांना दिसत आहे.
मुबंई गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामाबाबत ठेकेदाराने तर अक्षरशः खिल्ली उडवली असल्याचे समोर आले आहे तर कित्येक वर्षे रखडले आहे तसेच नागोठणे कोलाड दरम्यानची सडक नुकतीच मे महिन्यात नव्याने डांबर टाकून बनवली होती परंतु आता पहिल्याच सुरू झालेल्या पावसात त्याची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. कोलाड कडून नागोठणेकडे जाणाऱ्या रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडलेले असल्याने जणू या महामार्गावरील रस्ताच हरवला असल्याचे दिसत असुन रस्त्या तुला शोधू कोठे असाच प्रश्न वाहन चालकांना पडलेला आहे.
मुंबई-गोवा हायवे मार्गावर दररोज होणारे अपघाताच्या दृष्टीने हा महामार्ग चौपदरीकरण व्हावा यासाठी रायगड पत्रकारांनी आंदोलन केले व रस्त्याचे काम ही सुरु झाले परंतु या कामाला बारा वर्षे पुर्ण म्हणेज एक तप पुर्ण झाले तरी रस्त्याचे काम पुर्ण झाले नाही.दरवर्षी सात किमी रस्ता केला असता तरी रस्त्याचे काम पुर्ण झाले असते. परंतु नियोजन शुन्य असल्यामुळे हे काम अद्याप रखडले आहे. उलट करोडो रुपये खर्च करूनही परिस्थिती जैसे थे अशी आहे.याचा त्रास वाहन चालकांसह प्रवाशी वर्गाला सहन करावा लागत आहे.यामुळे या महामार्गाच्या खड्डयांपासुन सुटका केव्हा होणार असा खडा सवाल प्रवाशी वर्गातून केला जात आहे.