विश्वास नांगरेंच्या पत्नीवरही आरोप
मुंबई | प्रतिनिधी |
अजित पवार यांच्या जरंडेश्वर घोटाळ्याप्रमाणेच जालन्याच्या अर्जुन खोतकरांनी घोटाळा केला आहे. त्यात विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रूपाली विश्वास नांगरे-पाटील, त्यांचे सासरे पद्ममाकर मुळे यांचीही नावे आहेत. या प्रकरणाची सीबीआय किंवा न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी मागणी रविवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. हिम्मत असेल, तर माझ्या आरोपाचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्जुन खोतकरांनी द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
सोमय्या म्हणाले, चोरी केली नाही तर आनंद अडसूळ का लपून बसलेत. आता मी आणखी एक नाव वाढवत आहे. मी अर्जुन खोतकरांच्या जालना सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर काढला आहे. खोतकरांनी स्पष्टीकरण दिलेय की त्याचा आणि माझा संबंध काय. मात्र, माझ्याकडे त्याची कागदपत्रे आहेत. जालना साखर कारखान्याचा मालक अर्जुन इंडस्ट्रीज आहे. त्याचे मालक कोण आहेत. 2018 ला अर्जुन शुगर इंडस्ट्रीजची स्थापना अर्जुन खोतकर यांनी केली, असा दावाही त्यांनी केला. सोमय्या म्हणाले, फेब्रुवारी 2012 ला कारखाना आजारी पडला. त्याचे टेंडर 28 फेब्रुवारीला निघाले. निविदा तापडिया कंपनीच्या नावाने दिली गेली. या कंपनीने कारखाना विकत घेताना बांधकाम करणार म्हणून ताब्यात घेणार म्हटले. 42 कोटी 18 लाख 62 हजारांत विकत घेतला. हिम्मत असेल, तर मुख्यमंत्री आणि अर्जुन खोतकरांना उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.