अपघातात चार जण जखमी
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत-कल्याण या राज्यमार्गावर चार वाहनाचा विचित्र अपघात झाला आहे. दैव बलवत्तर म्हणून या अपघातातील सर्व प्रवासी थोडक्यात बचावले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी व प्रवासी चालकांनी गर्दी केली होती तर स्थानिक पोलिस देखील घटनास्थळी वेळीस हजर झाले.
दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कर्जतहुन नेरळ च्या दिशेने निघालेल्या मारुती सुजूकी कंपनीची ब्रिजा कार,या वाहन चालकाने कर्जत कल्याण या राज्यमार्गावर येत असलेल्या नेरळ-माणगाव गावाजवळील इबसार पेट्रोल पंपा समोर चुकीच्या दिशेने अचानक समोर आलेल्या दुचाकी वाहनाला अपघात करत,विरुद्ध दिशेकडे नेरळहुन कर्जतच्या दिशेला निघालेल्या तीन चाकी ऑटो रिक्षाला अपघात केला. आणि समोरून येणार्या सेलिरो या कार कारलाही धडक दिली. या घडलेल्या विचित्र अपघातात सर्व प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. अपघात करणारी ब्रिजा कार कर्जत वावलोली येथील असून अमोल मोरे व त्याचा साथीदार असे दोघे या कार मधून प्रवास करत होते. त्यातील एका व्यक्तीच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव झाल्याने उपचारासाठी दोघांनाही रायगड हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. सेलिरो कार मध्ये बदलापूर येथील राजेंद्र बाळकृष्ण पातकर व त्यांची पत्नी तर दोन लहान मुले हे बचावले असून पातकर यांच्या लहान मुलीला इजा झाली आहे. यातील रिक्षा चालक थोडक्यात बचावला असून दुचाकी वाहनावरील चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे.
एकंदरीत, आज घडलेल्या या चार वाहनांच्या विचित्र अपघातातून सर्वजण जरी सुखरूप बचावले असले तरीही कर्जत कल्याण या राज्य मार्गावरील अपघाताची मालिका संपणार कधी? हा देखील मोठा प्रश्न आहे.