। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
संगमेश्वर येथे एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. अवघ्या आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली आहे. शाळेत जाण्यासाठी आईने वेळेवर न उठवल्याने, रागाच्या भरात मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून तिच्या कुटुंबियांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
काही दिवसांपूर्वीच संगमेश्वर तालुक्यातील एका युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. तर दोन-तीन दिवसांपूर्वी संगमेश्वरमध्ये पुन्हा एक अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. मृण्मयी गजेंद्र देशमुख (13) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. शाळेत जाण्यासाठी आईने वेळेवर उठवले नाही याचा मुलीला प्रचंड राग आला आणि त्याच रागातून तिने आत्महत्या केली. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कामेरकर, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी शिवकुमार पारवे यांनी घटनास्थळी भेट दिली.