। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नापसंद निर्णयामुळे नाराज असलेल्या आणि दुसर्यांदा राजिनामास्त्र बाहेर काढलेले माजी आ. सुरेश लाड यावेळी मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. दोन दिवसात विश्वासू कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सुतोवाच सुरेश लाड यांनी केले असून लाड यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचे संकेत दिल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. लाड नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून लाड बाहेर पडले तर राष्ट्रवादीत उभी फुट पडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार सुनील तटकरे आणि माजी आ. सुरेश लाड यांची मैत्री रायगड जिल्ह्यातील राजकारणात सर्वश्रुत आहे. 35 वर्षाहून अधिक काळ ही मैत्री जिल्ह्याने पहिली आहे. मात्र सुरेश लाड यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने मदो हंसो का हा जोडाफ आता बिछडण्याची दाट शक्यता निर्माण झालीय. माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून पक्षाच्या सर्व व्हॉट्सप ग्रुपमधून सुरेश लाड बाहेर पडले आहेत. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन दोन दिवसात आगामी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सुतोवाच सुरेश लाड यांनी केले आहे. लाड राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर राष्ट्रवादीत उभी फुट पडण्याची शक्यता आहे. खासदार सुनील तटकरे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी काय प्रयत्न करतात याचीही उत्सुकता आहे.
गेली काही दिवस सुरेश लाड नाराज होते. यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात असताना लाड यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. खा.सुनील तटकरे यांनी पनवेल येथे लाडांची भेट घेऊन मध्यस्थी केल्याने सुरेश लाड यांनी राजीनामा मागे घेतला होता. 11 एप्रिल पासून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने तीन दिवस रायगड जिल्ह्यात होते. या दौर्याची संपूर्ण तयारी जिल्हाध्यक्ष या नात्याने सुरेश लाड यांनीच केली होती. उरण येथील कार्यक्रमातून सुरेश लाड तडकाफडकी बाहे पडले. कर्जत येथे झालेल्या मेळाव्यालाही सुरेश लाड उपस्थित नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात होते. दोन दिवस नॉट रीचेबल असलेले सुरेश लाड कर्जत येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांची त्यांना भेटण्यासाठी गर्दी झाली होती. आपण राष्ट्रवादीमधून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट संकेत सुरेश लाड यांनी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलताना दिले आहेत.
तीन दिवसांचा जनसंवाद दौरा संपवून खासदार सुनील तटकरे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नाना म्हात्रे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने रसायनीत आले होते. त्यावेळी तटकरे यांनी खालापूर आणि कर्जत तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सुरेश लाड यांची समजूत काढण्याच्या सूचना दिल्या. तटकरेंचा निरोप घेऊन गेलेल्या कार्यकर्त्यांना लाड यांनी आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगत 2 दिवसात जाहीर होणारे महामंडळाचे अध्यक्षपदही आपल्याला नको असल्याचे ठामपणे संगितले. आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचे संकेतच यानिमित्ताने सुरेश लाड यांनी दिले आहेत.
खालापूर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेला पाठिंबा सुरेश लाडांना आवडला नव्हता. कर्जत मतदार संघात राष्ट्रवादीचा सामना शिवसेनेसोबत असताना पक्ष नेतृत्वाकडून ताकद दिली जात नसल्याची खंत लाड यांच्या मनात होती. आपणच उभे केलेले कार्यकर्ते आपल्याला डावलून थेट तटकरेंच्या संपर्कात राहतात. त्यामुळे आपले महत्त्व कमी झालेय असे लाड सतत बोलून दाखवत होते. आपल्याला डावलले जातेय, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी आपले महत्त्व राहिलेले नाही. अशी लाड यांची धारणा झाली होती. जिथे मान आणि सन्मान नसेल तिथे राहायचे कशाला अशी भूमिका सुरेश लाड यांनी घेतली आहे. अनेक लहान मोठे प्रसंगही याला कारणीभूत आहेत. त्यामुळे आता माघार नाहीच. असे मनाशी ठरवून सुरेश लाड राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सुरेश लाड बाहेर पडले तर राष्ट्रवादीत उभी फुट पडण्याची शक्यता आहे. खासदार सुनील तटकरे यांच्यासाठीही हा मोठा धक्का मानला जातोय. दोन दिवसात प्रामाणिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सुतोवाच सुरेश लाड यांनी केले असून लाड नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, माजी आमदार सुरेश लाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.