कुटुंबाचे वर्षभराचे अर्थकारण कोलमडले
दोन वर्षे सातत्यातने आर्थिक फटका
| राकेश लोहार | चौल |
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आंब्याची काढणी करुन तो विक्रीसाठी वाशी मार्केटमध्ये पाठविला जातो. यावर्षी वातावरणात झालेले बदल, अवकाळी पाऊस आणि अचानक उष्णतेत झालेली वाढ यामुळे आंब्याचा मोहोर करपण्याचे आणि गळून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार असून, त्यामुळे कुटुंबाचे वर्षभराचे अर्थकारण कोलमडण्याची भीती आहे, अशी प्रतिक्रिया अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील आंबा बागायतदार मधुकर गणपत नाईक यांनी कृषीवलशी बोलताना दिली.
आंबा हा फळांचा राजा असून, सद्यःस्थितीत हमखास चार पैसे मिळवून देणारे फळपीक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. परंतु, बदलते हवामान, वाढता उष्मा आणि बारमाही पडणार्या अवकाळी पावसाचा जबर फटका आंबा पिकाला बसत आहे. या अवकाळीच्या फेर्यात अडकल्याने आंबा बागायदार मागील दोन वर्षांपासून कोलमडून गेला आहे. आंब्यांची चार-दोन झाडे असली तरी पावसाळ्यासाठी लागणार्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी त्याचा हातभार लागतो. त्यामुळे सर्वसामान्य शेतकर्यावर येणारा आर्थिक भार काहीसा हलका होत असतो. परंतु, दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंबा मोहोराचे पर्यायाने फळांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे इथला बागायतदार शेतकरी हवालदिल होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला आणि हापूस आंब्याला पहिल्या टप्प्यातील आलेला मोहोर कुजून गेला. मावा व तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात आंब्यावर प्रादुर्भाव झाला. त्यामुळे महागडी कीटकनाशके, पेस्टीसाईड्स व बुरशीनाशके यांचा वापर करुन प्रचंड मेहनत घेतली; परंतु त्याचा उपयोग झाला नाही, असेही नाईक म्हणाले. मोहोर धरला मात्र मोहरात नर फुलांचे प्रमाण अधिक असल्यामुळे फळधारणा झाली नाही. त्यामुळे या वर्षीचा हंगाम गतवर्षीपेक्षा वाईट झाला आहे. जेमतेम 10 ते 15 टक्के उत्पन्न मिळणार असल्याचे शेतकरी मधुकर नाईक यांनी सांगितले.
सप्टेंबर महिन्यापासून फवारणीला सुरुवात होते. परंतु, खराब हवामानामुळे फेब्रुवारीला संपाणार्या फवारण्या मार्चपर्यंत व पुढेदेखील लांबल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात औषधांचा खर्च वाढला आहे. त्यातच खराब हवामानामुळे वाटाण्याएवढे आंबेदेखील धरले नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यातच डिसेंबर महिन्यात पडलेल्या पावसाने आंबा बागातदारांचे कंबरडे मोडले आहे. मोहोर गळून पडला, तसेच पाण्याची पातळी वाढल्याने आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया मंदावली. त्यामुळे डिसेंबर महिना बागायतदारांसाठी चिंताजनकच गेला आहे. अगोदर मोहोर आला तो बुरशी व बुरशीजन्य रोगांनी नुकसान झाले. जानेवारीमध्ये आलेल्या मोहोराने अगोदरचे आंबे पाडून टाकले. त्यातच आता उरला-सुरला जो आंबा आहे, तोदेखील सद्यःस्थितीत वाढत्या उष्म्यामुळे गळून पडू लागला आहे. शिवाय, आंब्याला झाडावरच चिरा पडत आहेत. त्यामुळे हे मोठे नुकसान बागायदारांना सहन करावे लागत आहे. त्यामुळे सरकारने आम्हा बागायतदार शेतकर्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे मधुकर नाईक म्हणाले.
उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन
माझी 100 कलमांची हापूस आंब्याची बाग आहे. सद्यःस्थितीत त्यातील 50 ते 60 झाडांना फळधारणा होते. बाकी अजून लहान आहेत. या आंबा पिकातून वर्षभराचा कुटुंबाचा घरखर्च भागतो. परंतु, मागील दोन-तीन वर्षांपासून चक्रीवादळ, कोरोना काळात निर्यात ठप्प झाल्यामुळे आंबा जागेवरच राहिल्याने झालेले आर्थिक नुकसान, वाढता उष्मा आणि शेतकर्याच्या मानगुटीवर बसलेले अवकाळी पावसाचे संकट यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान होत आहे. ज्या ठिकाणी 800 ते 1000 पेटी आंबा काढायचो, त्याठिकाणी आज 100 पेटीसुद्धा आंब्याचे उत्पादन मिळणार नाही. आलेला सर्व मोहोर करपून गेला आहे. शिवाय, उरलेले पीक वाचविण्यासाठी औषध फवारणीसाठी केलेला खर्चसुद्धा आता यातून सुटणार नाही. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून कुटुंबाच्या उदरनिर्वाचे हक्काचे साधन आम्ही गमावले आहे, अशी प्रतिक्रिया मधुकर नाईक यांनी दिली.
बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसतोय. मोहोर सतत गळून पडतोय. फवारणी आणि इतर खर्च न परवडणारे आहेत. मायबाप सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. यावर उपाययोजना करुन उत्पादनवाढीसाठी शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.
मधुकर नाईक, आंबा बागायतदार, चौलमळा