पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील आड, चांभारगणी बुद्रुक ते किनेश्वर आणि पेढावाडीपर्यंत जाणार्या रस्त्यावरील तीन पुलांपैकी एक पूल बुधवारी रात्री जोरदार पावसामुळे नदीपात्रामध्ये कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. नवीन पुल उभारण्यात येईपर्यंत ग्रामस्थांना आता नदीच्या उथळ पात्रातूनच अचानक उदभवणार्या पुरस्थितीचा धोका पत्करून पायवाट करावी लागणार आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत आड ते किनेश्वर रस्त्याचे भूमीपूजन नुुकतेच पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.त्यावरुन परिसरातील राजकारणही चांगलेच तापले होते.शिवसेना,राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर सोहळेही झाले होते. कथित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचे राजकारण तापले असताना आता हा किनेश्वर रस्त्यावरील पूल कोसळल्याने राजकीय आडाखेही कोसळले आहेत. दरम्यान, हा पूल कोसळल्याने पोलादपूर तहसिल कार्यालयातील मंडलअधिकारी सिनकर आणि तलाठी फुलवर यांनी अहवाल तयार करून तहसिल कार्यालयाला सादर केला आहे.