। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशात ज्याप्रमाणे इंधनाचा साठा केला जातो त्याच पद्धतीने ऑक्सिजन अर्थात प्राणवायूचा साठा करायला हवा, अशी महत्त्वपूर्ण शिफारस राष्ट्रीय टास्क फोर्सने आपल्या अहवालात केली आहे. टास्क फोर्सने अहवाल सर्वोच्च न्यायालापुढे सादर केला. दरम्यान, टास्क फोर्सच्या शिफारसींवर अंमलबजावणी कशा पद्धतीने करणार? याचा कृती आराखडा केंद्र सरकारने सादर करावा, असे आदेश न्यायालयाने आज दिला.कोरोनाच्या दुसऱया लाटेत राजधानी दिल्लीत 700 मेट्रीक टन मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे न्यायालयाचा अवमान खटला दाखल केला गेला. त्याविरुद्ध केंद्र सरकराने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. या याचिकेवर आज न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम.आर. शहा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने नॅशनल टास्क फोर्सचा अहवालही सादर झाल्याची माहिती दिली.