नव्या पिढीची शेतीकडे पाठ
शेती टिकविण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न
| चिरनेर | वार्ताहर |
पारंपरिक शेती हा रायगडचा शेतीनिष्ठ गाभा आहे. त्यामुळे शेतकरी हा भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हल्ली शेती करणे परवडत नाही अशी ओरड ऐकायला मिळते, यात तथ्यदेखील आहे. खर्च जादा आणि उत्पन्न कमी असे प्रकार अनुभवायला मिळतात. त्यातच नेहमीच शेतकर्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. एकंदरीत नेहमीच होणारा निसर्गाचा कोप आणि वाढती महागाई यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. त्यामुळे नव्या पिढीने शेतीकडे पाठ फिरविल्याचे जाणवते.
रायगडच्या उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे येथील अनेक भागात आज जेवढी शक्य होईल तेवढीदेखील भातशेती केली जात नाही. एकेकाळी येथील अनेक ग्रामीण भागात डाला पद्धतीची भातशेती ही श्रमविभागणी आणि खर्चाची बचत करणारी ठरली होती. परंतु, आधुनिक युगात वावरणारी पिढी आणि उरण तालुक्यात उभे राहिलेले नवनवीन प्रकल्प यामुळे काही प्रमाणात येथे लागवडीखाली शिल्लक राहिलेली भातशेती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री व मजुरीचे दर भरमसाठ वाढल्याने शेती करणे शेतकर्यांना अवघड झाले आहे. एकंदरीत सर्वत्र वाढती महागाई यामुळे शेती व्यवसाय धोक्याच्या संकटात सापडला आहे.
दरम्यान, येथील शेती टिकवण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शेतकर्यांना आधुनिक शेतीच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या शेतीच्या विविध योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी येथील कृषी विभाग प्रयत्नशील आहे. शेती शाळेच्या माध्यमातून शेतकर्यांना देण्यात येणार्या प्रशिक्षण व मार्गदर्शनातून आधुनिक शेतीचे धडे दिले जात आहेत, तर सेंद्रिय शेती व फळ पिकांची लागवड करण्यासाठी शेतकर्यांना आकर्षित केले जात आहे.
डाला पद्धत म्हणजे काय?
डाला भातलावणीची परंपरा फार जुनी असून, संत तुकारामांच्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायाने करण्यात आली होती. भातशेतीच्या लावणी-कापणीच्या कामाच्या वेळी अनेकदा मोठी गैरसोय होत होती. परंतु, या प्रक्रियेत चार-पाच कुटुंबे एकत्र येत, श्रमदानातून शेतीची कामे आनंदात करीत असत. त्यामुळे कशाचीही गैरसोय होत नव्हती. त्यामुळे त्यावेळी शेतकरी समाधानी होता. मात्र, आपल्या वाडवडिलांनी जपलेल्या या परंपरा आजच्या आधुनिक युगातही प्रेरणादायी ठरत असल्या, तरी नैसर्गिक आपत्ती व महागाई यामुळे आज या परंपरांची जपणूक होत नसल्याने त्या परंपरा नामशेष होण्याच्या मार्गावर आल्या आहेत.