शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अखेरचा निरोप
। मुंबई । प्रतिनिधी ।
आशा भोसले यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. भारतीय संगीतातील एक सुवर्णयुग आज खऱ्या अर्थाने संपले आहे. 12 एप्रिलला, रविवारी त्यांचे निधन झाल्यानंतर, आज सोमवारी (दि.13) मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आशा भोसलेंचे पार्थिव लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, जिथे संगीत, कला आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांचे शेवटचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे, कुटुंबीय व चाहत्यांच्या उपस्थितीत या महान गायिकेला निरोप देण्यात आला. आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. त्याचबरोबर आमिर खान, विकी कौशल, आशा भोसलेंची बहीण उषा मंगेशकर उपस्थित होत्या. गायक शानने यावेळी गाणे गात आशाताईंना अखेरचा निरोप दिला.
