पंतप्रधान मोदींचा तालिबानला संदेश
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दहशतवादामुळे विश्वास चिरडला जाऊ शकत नाही. ज्यांनी दहशतीच्या आधारावर साम्राज्य उभे केले, त्यांचे अस्तित्व कायम राहात नाही. ते मानवतेचा आवाज दडपू शकत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या कार्यक्रमात बोलत होते.
अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचं नियंत्रण एका दहशतवादी संघटनेच्या हाती जाणं हे केवळ अफगाणिस्तानवरच नव्हे, तर आशिया खंडासह जगभरातल्या अनेक देशांवर परिणाम करणारं ठरू शकतं. भारताचे अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध होते आणि तिथे अनेक प्रकल्पही भारताने उभारले होते; मात्र तालिबानने अफगाणिस्तान काबीज करून आता आठवडा होत आला, तरी अद्याप भारताकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या काही प्रकल्पाचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. यावेळी मोदींनी तालिबानबद्दलची भूमिका अप्रत्यक्षपणे मांडल्याचं मानलं जात आहे. ’दहशतीच्या जोरावर साम्राज्य उभं करणार्यांचं अस्तित्व स्थिर स्वरूपाचं नसतं. आस्था दहशतीच्या जोरावर चिरडून टाकता येत नाही,’ असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
दहशतीच्या जोरावर साम्राज्य तयार करण्याच्या विचारधारा कदाचित काही कालावधीपुरत्या शिरजोर होतीलही; मात्र त्यांचे अस्तित्व कधीच शाश्वत असत नाही. या शक्ती आणि विचारधारा फार दिवस मानवतेला दाबून ठेवू शकत नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारतीय दूतावासावर छापा
तालिबान्यांनी कंदहार आणि हेरातमधल्या भारतीय दूतावासावर छापा मारुन कागदपत्र शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच दोन्ही दूतावासात पार्क केलेल्या गाड्या घेऊन निघून गेले. कंदहार आणि हेरातमधल्या दुतावासातून तालिबानने काही गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न केल्याची गुप्तचरांची माहिती आहे.