| मुंबई | प्रतिनिधी |
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खेळ आणि शिक्षण यांचा योग्य ताळमेळ साधणे गरजेचे आहे, असा सल्ला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी युवा क्रिकेटपटूंना दिला. ओव्हल मैदान येथे झालेल्या ड्रीम 11 चषक क्रिकेट स्पर्धेच्या (14 वर्षांखालील) अंतिम सामन्यासाठी वेंगसरकर उपस्थित होते.
शालेय परीक्षांचा काळ आता जवळ आला आहे. त्यामुळे खेळाबरोबरच मुलांनी अभ्यासालाही प्राधान्य द्यायला हवे. खेळ आणि शिक्षण यांचा योग्य मेळ साधला, तर तुम्ही आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल.
दिलीप वेंगसरकर, क्रिकेटर
संघासाठी सर्वस्व झोकून देताना शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असेही वेंगसरकर यांनी सांगितले. अंतिम फेरीत वेंगसरकर क्रिकेट अकादमीने संजीवनी क्रिकेट अकादमीचा 71 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अनिरुद्ध नायर (81) आणि हर्ष गायकर (77) यांच्या अर्धशतकांमुळे वेंगसरकर अकादमीने 35 षटकांत 5 बाद 249 धावा केल्या. प्रत्युत्तरात डावखुरा फिरकीपटू जतीन जेठवा (4/16) आणि हर्ष (3/51) यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे संजीवनी अकादमीचा डाव 31.1 षटकांत 178 धावांत आटोपला. त्यांच्याकडून हर्षवर्धनने 57 धावांची एकाकी झुंज दिली. अष्टपैलू कामगिरी करणारा हर्ष सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.