। जितेंद्र जोशी ।
रायगडच्या राजकारणात अनेक तरूण नेतृत्व आपल्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वामुळे आस्वाद पाटील यांनी राजकारणात भरीव यश संपादन केले आहे. मातृघराण्याकडून राजकीय वारसा लाभलेल्या आस्वाद पाटील यांनी 2007 साली अलिबाग पंचायत समिती सभापती म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली आणि केवळ 10 वर्षात रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, प्रभारी जि.प.अध्यक्ष या पदापर्यंत झेप घेत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे.
राजकारणामध्ये केवळ वारसा असून चालत नाही. राजकारणामध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक असणारी धमक आणि समाजमनाचा अभ्यास व चाणाक्षपणा याच्या जोरावर आस्वाद पाटील यांनी ही झेप घेतली आहे. 2007 च्या सुमारास चणेरा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी दरम्यान आस्वाद पाटील उर्फ पप्पूशेठ यांची सर्वप्रथम ओळख झाली. तेव्हापासूनच त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये आणि उक्तीमध्ये स्पष्टपणा दिसून आला. 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून त्यांच्या समवेत अधिक काळ काम करण्याचा योग जुळून आला आहे तो आता खूपच वृद्धींगत झाला असून,त्यांच्यासमवेत काम करताना त्यांच्यातील नेतृत्वाची धमक दिसून आलेली आहे.
तरूण असल्याने अनेक वेळा शेकापचे कार्यकर्ते पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील किंवा पंडित पाटील यांच्याशी बोलण्यापेक्षा पप्पूशेठ यांच्याशी बोलताना सहजपणे व्यक्त होताना दिसून येतात.त्यातून त्यांचाही जनसंपर्क कमालीचा वाढला आहे.पक्ष नेतृत्वाने देखील युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी शेकाप जिल्हा चिटणीसपदाची जबाबदारी आस्वाद पाटील यांच्याकडे दिलेली आहे.पक्षाचे चिटणीस म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे.विशेष करुन ज्येष्ठांचा सन्मान राखण्याबरोबरच युवा पिढीलाहा प्रोत्साहित करण्यात त्यांचा विशेष प्रयत्न असतो.त्यातून पक्षाची नवीन पिढी बळकट होताना दिसत आहे.
कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्या कामाचा अभ्यास करणे व पुढील परिणामांचा विचार करून निर्णय घेण्याकडे आस्वाद पाटील यांचा नेहमीच कटाक्ष राहिला आहे आणि एकदा काम हाती घेतले की ते शंभर टक्के तडीस नेण्यास त्याचा हातखंडा नेहमीच दिसून येतो. रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती हे पद सांभाळत असताना त्यांनी प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. पनवेल मनपाच्या निर्मितीने तालुक्यातील राजकीय भुगोल पूर्णपणे बदलला आहे.त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरही झालेला आहे.याशिवाय तालुक्याचे ठिकाण असणार्या अनेक ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्याने जिल्हा परिषदेचा आर्थिक ओघ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. परंतु तरीदेखील उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत उभारत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी अॅड. आस्वाद पाटील यांनी आपल्या अन्य सहकार्यांच्या मदतीने केलेले प्रयत्न वाखण्याजोगे होते हे निश्चित.
राजकीय क्षेत्रात करिअर करत असताना त्यांनी कबड्डीसारख्या अस्सल देशी खेळाच्या माध्यमातून आपली खेळातील आवड जोपासली आहे. राज्य कबड्डी संघटनेचे सहकार्यवाह हे पद भूषवित असताना रायगडात होणार्या अधिकाधिक कबड्डी स्पर्धांना हजेरी लावण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.मध्यंतरी कोरोनाच्या लाटेमुळे सर्व खेळांवर बंदी घालण्यात आली होती.ती बंदी उठताच आता रायगडात कबड्डी स्पर्धांना पुन्हा जोर आलेला आहे.अशावेळी कबड्डीपटूंसह स्पर्धा आयोजकांनाही प्रोत्साहन देण्याचे काम आस्वाद पाटील हे करताना दिसत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची रणरागिणी म्हणून ओळख आहे अशा त्यांच्या मातोश्री मीनाक्षीताई पाटील व चित्राताई सारख्या खंबीर पत्नीची साथ यामुळे पप्पूशेठ विविध क्षेत्रात अनेक शिखरे पादाक्रांत करतील. याबाबत कोणतीच शंका नाही. रोहा तालुक्यातील शेकाप कार्यकर्त्यांना सुमारे 25 वर्षानंतर आस्वाद पाटील यांच्यासारखे खंबीर नेतृत्व लाभलेले आहे.त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. रोहा तालुका व रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आस्वाद पाटील यांना दीर्घायुष्य लाभो हीच सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सदिच्छा!