कल्पतरू कंपनीने काम देण्यास दर्शवली तयारी
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील कल्पतरू कंपनीविरोधात ग्रामस्थांना काम द्या या अटीखाली दि.16 पासून सुरू असलेले नांगुर्ले ग्रामस्थांचे उपोषण कंपनीने काम देण्याची तयारी दर्शवल्याने दि.18 रोजी सायंकाळी स्थगित करण्यात आले आहे. ‘सोमवारपर्यंत वर्क ऑर्डर मिळेल, नाही मिळाली तर पुन्हा याच ठिकाणी मंगळवारी आमरण उपोषण करू’ या अटीवर उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, उपतालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, अनिल देशमुख, सुरेश शिर्के, मारुती भिलारे आणि नांगुर्ले ग्रामस्थ उपस्थित होते. उपोषणाच्या सुरुवातीपासून उपोषणस्थळाला विविध संघटना, राजकीय पक्ष यांनी पाठिंबा दर्शवला होता. यामध्ये पोलीस मित्र संघटनेचे रमेश कदम, पळसदरी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सुर्वे, राष्ट्रवादी पदाधिकारी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, राजेश लाड, मधुकर घारे, वकील राजेंद्र निगुडकर, रवींद्र देशमुख, महिला अध्यक्ष रंजना धुळे, नगरसेविका पुष्पा दगडे, पूजा सुर्वे, नगरसेविका भारती पालकर, वंदना शिंदे, वंदना थोरवे, अंकिता मोरे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत, उत्तम कोळंबे, बाबू घारे, सुदाम पवाळी, संपत हडप तसेच मनसेचे महेंद्र निगुडकर आदींनी आपला पाठिंबा जाहीर केला होता. या सर्वांचे ग्रामस्थांच्या वतीने कैलास म्हामले यांनी आभार मानले.
उपोषणस्थळी तालुक्यातील अशा विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी भेट देत होते.नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद साबळे यांनी पाठिंबा देत या तहसीलदार यांना तहसील येथील बैठकीत शेतकऱ्यांना न्याय द्या, वातावरण खूप तप्त आहे. उष्माघाताने एखादा बळी गेला तर याला प्रशासन जबाबदार राहील, असे सांगितले.