| मुंबई | प्रतिनिधी |
बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील 36 ते 48 तासांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार असून, त्यानंतर तो हळहळू उत्तरेकडे सरकणार आहे. याचा परिणाम जोरदार वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन जूनपर्यंत केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा ताशी 40-50 किलोमीटर प्रती तास इतका राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे.