| माढा | वृत्तसंस्था |
माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यावरून महायुतीमधील घटक पक्षांतील नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर व भाजपचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असून, फलटण तालुक्यात कोण ठरणार बाहुबली? याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.
2019 मध्ये निवडून आलेल्या खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत आपल्या मतदारसंघातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांच्या कामांसाठी निधीच्या तरतुदी करून घेऊन एकेक प्रकल्प मार्गी लावत फलटण, माळशिरस, माण, खटाव, कोरेगाव, सांगोला, माढा, करमाळा आदी तालुक्यांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावला.
सद्य:स्थितीत महायुतीत असतानाही रामराजे यांनी उघडपणे खासदार रणजितसिंह यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. रणजितसिंहांना संसदेऐवजी घरचा रस्ता दाखविण्यासाठी त्यांनी दंड थोपटले आहेत. त्यातच त्यांच्या गटाच्या गोपनीयपणे बैठका सुरू झाल्या असून, खासदार रणजितसिंह यांना पराभूत करायचेच, यासाठी चंग बांधला आहे. दुसरीकडे खासदार रणजितसिंह यांनीही मतदारसंघातील पाच आमदार आपल्या बाजूने असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, धैर्यशील मोहिते-पाटील यांनी खासदारांच्या विरोधात दंड थोपटले असून, निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. लोकसभेची ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची ठरणार आहे. हा निकाल पुढील निवडणूक निकालांवर परिणाम करणारा ठरणार असल्याने रामराजे नाईक-निंबाळकर व रणजितसिंह नाईक-निंबाळकर या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.