| पाली-बेणसे | प्रतिनिधी |
वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील पाली गावालगत असणार्या आंबा नदी पुलाचे संरक्षण कठडे तुटून नदीत पडल्याने मृत्यूमुख उघडे पडले आहे. या पुलाचे कठड़े म्हणून प्लास्टिक पट्टी काम करीत आहे, परिणामी जिवघेण्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. अशातच महामार्गाच्या धोकादायकव जिवघेण्या परिस्थितीकडे एम.एस.आर.डी.सी.सी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
वाकण पाली खोपोली महामार्ग वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मार्ग असून सद्यस्थितीत या मार्गाची भयावह अशी दुरावस्था झाली आहे. अशातच या मार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे होत असलेले काम असुरक्षित व धोकादायकरित्या होत असल्याने या मार्गावरील अपघातांची संख्या वाढली आहे. या मार्गावर झालेल्या अपघातात अनेक निष्पाप जिवांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर अनेकांना विकलांग होण्याची वेळ आली आहे.
या मार्गावर जंगलीपिरनजीक नदीलगत असलेले संरक्षण कठडे तुटून दोन वर्षाचा काळ उलटून गेला तरी अद्यापर्यंत तुटलेले संरक्षण कठडे बसवून रस्ता सुरक्षित करण्यास सबंधीत प्रशासनाला कोणतेही स्वारस्य नसल्याचे दिसून येत आहे. पाली आंबा नदी पुलाचे संरक्षण कठडे तुटलेल्या अवस्थेत असल्याने लहान मोठी खोल नदीपात्रात कोसळून अपघाताचा मोठा धोका जाणवत आहे. यापुर्वी आंबा नदीपुलावरुन झायलो नदीपात्रात कोसळून वृध्द महिलेला आपले प्राण गमवावे लागले होते. हा पुल जुना व जर्जर झाला असून चहुबाजुंनी मोडकळीस आलेला हा धोकादायक पुल केव्हाही कोसळून मोठी जिवीतहाणी होण्याची भिती जनमाणसातून वर्तवली जात आहे. या मार्गाची अशी जिवघेणी व धोकादायक अवस्था असताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मात्र जिवघेणे अपघात घडून निष्पाप जिवांचा बळी जाण्याच्या प्रतिक्षेत आहे का? असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे. पाली, पुलासह या मार्गाच्या दुरुस्तीबरोबरच योग्य ती उपाययोजना करण्यात यावी व रस्ता सुरक्षित करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.