। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांकडे शासनकर्ते ढुंकूनदेखील पाहात नसल्याचे चित्र आहे. त्या गाव जोडणार्या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्याची घोषणा होते आणि नारळदेखील फोडले जातात. मात्र, रस्त्यांची अवस्था आजही खड्ड्यात हरवलेले रस्ते अशीच आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा प्रवास खड्डेमय रस्त्यानेच सुरु आहे.
कर्जत तालुका अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे ग्रामीण भागातील रस्ते कशेळे, खांडस, नांदगाव, चई भोपळीवाडी, कळंब-बोरगाव, ओलमन, तेलंगवाडी, ताडवाडी कुरूंग, तसेच कशेळे, कवठेवाडी फाटा, सुगवे लोभेवाडी, फाटा कशेळे, कोटींबे, अंबिवली, रजपे, टेबरे, धोत्रे, धोत्रेवाडी शिंगढोल, रजपे पाचखडकवाडी, वारे, देवपाडा, साळोख-पोंडेवाडी-नारळवाडी या रस्त्यांकडे कोणालाच लक्ष देण्यासाठी वेळ नाही. कित्येक वर्षांपासून रस्त्याच्या समस्या मांडल्या जातात; पण लक्ष न देता समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
यावर्षीच्या पावसाला नुकतीच सुरुवात होत आहे. पहिल्याच पावसात सर्व रस्ते पाण्याने व मातीने चिखलाने भरून आलेत. खड्डे पडलेल्या ठिकाणी पाणी साचून तळे झाले आहे. यामुळे वाहन चालकांना समजत नाही रस्त्याला खड्डा किती मोठा आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पावसात रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर ते दिसेनासे होतील, गावातील संपर्क तुटला जाईल, तालुक्यातील ग्रामीण भागाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.