| माणगाव | प्रतिनिधी |
कोकणात पावसाळ्याचे आगमन जवळ आल्याने गेल्या सहा महिन्यांपासून कोकणात वास्तव्यास असलेले घाटमाथ्यावरील मेंढपाळ आता आपल्या शेळ्या-मेंढ्यांसह परतीच्या प्रवासाला लागले आहेत. दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात हे मेंढपाळ आपल्या कळपांसह कोकणात दाखल होतात आणि उन्हाळ्याच्या अखेरीपर्यंत येथे वास्तव्यास राहतात. कोकणातील जंगल परिसरात तसेच मोकळ्या जागांमध्ये शेळ्या-मेंढ्या चारून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. याचबरोबर कोकणातील अनेक शेतकरी आपल्या शेतांमध्ये या कळपांना रात्री बसवितात. मेंढ्या व बकऱ्यांच्या विष्ठेमुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. त्याबदल्यात शेतकरी मेंढपाळांना ठराविक मानधन देतात. सुमारे सहा महिन्यांच्या मुक्कामानंतर आता पावसाळ्याची चाहूल लागल्याने मेंढपाळांनी घाटमाथ्याकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे. शेकडो शेळ्या-मेंढ्यांचे कळप घेऊन हे मेंढपाळ दररोज अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करीत आहेत. उन्हाचा कडाका वाढत असल्याने सकाळच्या थंड वातावरणात अधिक प्रवास केला जात असून दुपारच्या वेळेत झाडांच्या सावलीत विश्रांती घेतली जात आहे. कोकण आणि घाटमाथा यांना जोडणारी ही पारंपरिक भटकंतीची पद्धत आजही कायम असून ग्रामीण अर्थव्यवस्था, पशुपालन आणि नैसर्गिक शेती यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करणारी ठरत आहे. पावसाळ्यापूर्वी आपल्या मूळ गावी पोहोचण्यासाठी मेंढपाळांचा हा प्रवास पुढील काही दिवस सुरू राहणार आहे.







