पाऊस तोंडावर असताना घरकुलांची कामे अर्धवट
| राबगाव/पाली | वार्ताहर |
प्रत्येक गोरगरिबाला स्वतःचे छप्पर मिळावे यासाठी शासन घरकुल योजनेची अंमलबजावणी सर्वत्र करीत आहे. परंतु, सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायत हद्दीतील खुरावले आदिवासी वाडीतील सहा कुटुंबांनी आपले राहते घर पाडून त्याठिकाणी मंजूर घरकुलांतर्गत बांधकामाला सुरुवात केली. दरम्यान, ग्रामसेवकाने संबंधित कुटुंबांना तांत्रिक अडचणीचे कारण देत त्यांचे घरकुलाच्या कामाची बिल थांबवल्याने आदिवासी कुटुंबावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उघड्यावर राहाण्याची वेळ आली आहे.
बिल न मिळाल्याने घरकुल बांधकाम थांबवल्यामुळे चिवे ग्रामपंचायत हद्दीतील खुरवले आदिवासी वाडीतील गीता गणपत वाघमारे, लता मंगेश वाघेरे, गुलाब सुनील वाघमारे, आशा शिवराम हिलम, नथू लहू पवार, दिपाली रवी पवार हे सहा आदिवासी कुटुंब मुलाबाळांसहित हवालदिल झाले आहेत. यामुळे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी मूग गिळून बसल्याने होणारा अन्याय दूर करून आमच्या हक्काचे छप्पर आम्हाला मिळवून द्यावे व आमच्या मुलाबाळांचे रक्षण करावे, अशी भावनिक साद घालत आहे.
चिवे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खुरावले आदिवासीवाडी येथे गेल्या कित्येक पिढ्यान् पिढ्या ही सहा कुटुंबं राहात आहेत. त्यांचे कारवीच्या काड्यांच्या पडक्या घरात वास्तव्य होते. त्यांनी घरकुल मिळावे म्हणून अर्ज केल्यावर शासकीय यंत्रणेने सर्व्हे करून त्यांना 2024/25 मध्ये घरकुल मंजूर झाले. घरकुल मंजूर झाल्याने ग्रामसेवकांनी त्यांना घर पाडून घरकुल बांधण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्यांनी आपली झोपडी पाडून घरकुलाची पायाभरणीही केली. त्यांना घरकुलाचा पहिला हप्ताही मिळाला, त्यानंतर त्यांनी पुढील कामही सुरू केले. परंतु, अचानक ग्रामसेवकाने स्थानिक तक्रार आल्याचे सांगून घरकुलाचे कामाची बिले थांबविली. त्यामुळे या आदिवासी बांधवांना अवकाळी पावसाचा उघड्यावर सामना करावा लागला.
वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली संसार
घरकुलाला तांत्रिक कारण देत बिल न काढल्याने ते काम बंदच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या सहा आदिवासी कुटुंबातील सदस्यांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर राहण्याची कुठलीही सोय नसल्याने त्यांना मुलाबाळांसहित उघड्यावर राहून गुजरान करावी लागत आहे. गेली चार-पाच दिवस तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. विजांच्या कडकडाटाचा सामना करीत विषारी वन्यजीवाचा त्यांचे जीवितास धोका निर्माण झाला असल्याने ते दहशतीखाली जीवन जगत आहेत.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बिल न दिल्याने काम बंद केले. सध्या आमच्या कुटुंबाला निवारा नसल्याने जंगल पट्ट्यात उघड्यावर जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. आमचे घरकुल पूर्ण रक्कम देऊन आम्हाला घरकुल पूर्ण करू द्यात अन्यथा ऐन पावसाळ्यात आमच्या कुटुंबातील सदस्यांचे काही बरे-वाईट झाल्यास त्यास संबंधी प्रशासन जबाबदार असेल.
गीता गणपत वाघमारे,
लाभार्थी, खुरावळे आदिवासीवाडी