उमटे धरणातील पाणी गढूळ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कावीळसह अन्य जलजन्य आजार होण्याची भीती

| अलिबाग | प्रतिनिधी |

पंचेचाळीस वर्षे जुन्या असलेल्या उमटे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पाणी कमी आणि गाळ जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा गाळ काढण्यास जिल्हा परिषद उदासीन ठरत असल्याने आजही येथील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या जलजन्य आजाराचा धोका उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरण रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित आहे. अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये 1978-79 या कालावधीत उमटे धरण बांधण्यात आले. या धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा, चौल या ग्रामपंचायत हद्दीतील 45 गावांतील सुमारे 60 हजारांहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या धरणाने तळ गाठला आहे. त्याचा परिणाम तालुक्यातील हजारो नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब, कावीळ, विषमज्वरसारखे जलजन्य आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाणीकपातीचे संकट सुरु झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या पाणीकपातीत वाढ करण्यात आली आहे. अनेक गावे, वाड्यांना तीन दिवसआड पाणीपुरवठा केला जातो. धरणाने तळ गाठला आहे. हजारो नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे.

जोपर्यंत लोकांच्या डोक्यातील राजकीय गुलामीचा गाळ निघत नाही, तोपर्यंत उमटे धरण आणि त्यातील गाळ तसाच राहणार आहे. आम्ही 2016 पासून आजपर्यंत या विषयावर अर्ज, तक्रारी करीत आहोत. उमटे धरणाच्या गाळाच्या आणि पाण्याच्या प्रश्नासाठी आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ लोकांवर येणे ही नामुष्की राज्यकर्ते आणि प्रशासनाची आहे.

ॲड. राकेश नारायण पाटील,
उमटे धरण आंदोलनकर्ते
Exit mobile version