। नागपूर । प्रतिनिधी ।
यवतमाळ जिल्ह्यातील सीमावर्ती भागात जनावरांची अवैध वाहतूक दररोज होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाने कंटेनरमध्ये जनावरे कोंबून हैद्राबाद येथे नेले जात असताना कंटेनर पकडले. या कंटेनरमधून तब्बल 60 गोवंशाची अवैध वाहतूक केली जात होती. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा उपविभागात अवैध धंदे तसेच इतर गुन्हे उघडकीस आणण्याच्या उद्देशाने पेट्रोलिंग करीत होते. अशातच एका कंटनेर वाहनातून गोवंशीय बैल कत्तलीकरीता पांढरकवडामार्गे हैद्राबाद येथे नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासह पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी गावजावळ सापळा रचला. तेव्हा एक कंटेनर नागपूरकडून येताना दिसताच त्याला थांबविले. वाहनातील व्यक्तींची विचारपूस केली असातना, त्यांनी वाहनात 60 गोवंशीय बैल असल्याचे व ते कत्तलीकरीता हैद्राबाद येथे नेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी करुन वाहनातील संतोष लोधा, मशीद अली रशीद अली, शाकीर अली अमानत अली या तिघांना ताब्यात घेतले. तसेच, पोलिसांनी कंटेनरसह 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून जनावरांची सुटका करण्यात आली.